पुतळा दुर्घटने प्रकरणी उद्या सावंतवाडीत निषेध, तहसीलदारांना निवेदन
सावंतवाडी : मालवण- राजकोट येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर १ सप्टेंबरला मराठा नेते मनोज जरांगे हे मालवण येथे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांनी दिली. दरम्यान पुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या ता. २९ ला सकाळी साडे दहा वाजता तहसीलदारांना निवेदन देवून निषेध नोंदवण्यात येणार असून यावेळी सावंतवाडी राजवाड्यात सर्व मराठा बांधव व शिवप्रेमी उपस्थित रहावे, असे त्यांनी सांगितले. आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अभिषेक सावंत, पुंडलिक दळवी, मनोज घाटकर, संजय लाड, प्रसाद राऊळ, आनंद गवस, नंदू विचारे, शिवा गावडे, श्रीपाद सावंत, राजे प्रतिष्ठानचे खजिनदार ज्ञानेश्वर पारधी आदी उपस्थित होते. यावेळी सावंत पुढे म्हणाले, पुतळा उभारण्याची जबाबदारी नौदलाकडे होती तर या पुतळ्यासाठी सिंधुदुर्ग मधून ६ कोटी रुपये खर्च का केले? राज्य शासनाने हा निधी का दिला? हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे, असा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला. दरम्यान याप्रकरणी माहितीच्या अधिकारात कागदपत्रे घेऊन जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पुतळा उभारताना रितसर परवानगी घेण्यात आल्या नव्हत्या. कलासंचालनाने अधिकृत मान्यता दिलेली नाही. दरम्यान अजित पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये शिल्पकार जयदीप आपटे व स्ट्रक्चरर चेतन पाटील यांना पुतळा बनवण्याचे कोणतेही अनुभव नसताना शोबाजी करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला होता, असा ही आरोप त्यांनी यावेळी केला तर त्या प्रकरणाची सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्यात यावीत अशी मागणी करीत पुतळा पडणे ही राज्याला काळीमा फासण्या सारखे आहे, असा आरोप करीत शंभर कोटींचा पुतळा उभारण्याची तुमची पात्रता नाही. आम्ही वर्गणीतून तो नक्कीच उभारू, असेही ते म्हणाले.