मुंबई : लालपरी अर्थास एसटी बसने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकाचे निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. मात्र दुसरीकडे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची चिन्ह आहेत. कारण एसटी महामंडळ बसच्या तिकीटदरात मोठी वाढ करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. एसटी बसच्या तिकिटदरात 14 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. एसटीकडून दरवाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयांच्या तिकिटामागे 15 जास्तीचे मोजावे लागणार आहेत. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळे एसटीकडून दरवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान याआधी 27 नोव्हेंबर 2021 रोजी तिकीटदरवाढ झाली होती. माहितीनुसार, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एसटी बसच्या दरवाढीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांपासून एसटीच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. अशातच महामंडळाकडून तिकीट दरवाढीचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. यात महामंडळाने 14.13 टक्के दरवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे.