आशिष सुभेदार आक्रमक ; सावंतवाडी पालिका प्रशासनाला इशारा
सावंतवाडी : शहरातील रस्ते खराब होण्यास ठेकेदारांकडून झालेले निकृष्ट दर्जाचे काम कारणीभूत आहे. त्यामुळे त्या ठेकेदारांकडून तात्काळ पुन्हा कामे करून घ्या, अन्यथा लवकरच पुराव्यानिशी पोलखोल करू, असा इशारा उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी दिला आहे. लाखो रूपये खर्च करून शहरातील करण्यात आलेले खड्डे पहिल्याच पावसात उघडले आहे. त्यामुळे त्याचा फटका नागरिकांना व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ सकारात्मक भूमिका घेऊन गणेश चतुर्थीपूर्वी हे खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, शहरातील बाजारपेठेतील रस्ते पहिल्याच पावसात उखडले आहेत. मे महिन्यात शहरातील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने सर्वच रस्ते डांबर उखडल्याने खड्डेमय झाले आहेत. गणेश चतुर्थी सण काही दिवसांवर आला आहे. शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना या खड्ड्यांमुळे अनेक त्रासाना सामोरे जावे लागत आहे. हे खड्डे बुजवण्यासाठी त्या ठिकाणी बारीक खडी टाकण्यात आली. परंतु त्या ठिकाणी स्लिप होऊन वाहनांचे अपघात होत आहेत. सावंतवाडी शहरातील नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. शहरातील प्रभागातील रस्ते खराब झाले आहेत त्या रस्त्यावर देखील खड्डे पडले आहेत. काही प्रभागात तर ठेकेदार यांच्या निकृष्ट कामामुळे खड्ड्यांचे साम्राज्य आहे, डांबरीकरण उखडून गेले आहे. तर काही प्रभागात अर्धवट रस्ते करण्यात आले आहेत त्यामुळे ठेकेदार यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. शहरात तसेच अंतर्गत प्रभागात रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे झालेले कामे प्रशासनाने ठेकेदारांकडून वॉरंटी पिरियड मध्ये चांगल्या दर्जाचे पुन्हा करून घ्यावे. बहुतांशी शहरातील रस्त्यांची कामे काही ठिकाणी इस्टिमेट नुसार झालेली नसून ती कामे दर्जाहीन आहेत त्यांची लवकरच पुराव्यानिशी पोल खोल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत तात्काळ योग्य ती भूमिका घेऊन चतुर्थीपूर्वी शहरातील रस्ते सुरळीत करण्यात यावे, अन्यथा प्रशासनाला घेराव घालून जाब विचारू असा इशारा, माजी आमदार उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी दिला आहे.