विधानपरिषदेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने जुळवुन घेतलं ; मात्र महायुतीत फाटाफूट पडल्याचं चित्र
मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. २६ जून रोजी विधानपरिषदेसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, अर्ज माघार घेण्याच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. विधानपरिषदेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने जुळवुन घेतलं आहे. मात्र महायुतीत फाटाफूट पडल्याचं चित्र आहे. मुंबई शिक्षक मतदार संघात तीन पक्षांचे उमेदवार आमने सामने आहेत. मविआच्या एका उमेदवाराविरुद्ध महायुतीचे तिघेजण मैदानात उतरले आहेत.
मविआमध्ये कोकणसह इतर मतदारसंघात बिनसल्याचं चित्र होतं. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पण उद्धव ठाकरे यांनी किशोर जैन यांची कोकण पदवीधर मतदारसंघातली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे काँग्रेसने नाशिक शिक्षक मतदारसंघात उमेदवारी मागे घेतली. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमित सरैया यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. मुंबई शिक्षक मतदारसंघातही काँग्रेसच्या प्रकाश सोनवणे यांनी अर्ज मागे घेतल्याने मविआमधली अंतर्गत धुसफूस मिटली.