20 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ करू नका अन्यथा होईल उद्रेक : अशोक सावंत

सावंतवाडी : वीज वाहिन्यांमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करत असताना शॉक लागल्याने वायरमन वीज खांबावरून थेट खाली कोसळल्यामुळे जखमी झाला.सावंतवाडी शहरातील मच्छी मार्केट परिसरात दुपारच्या सुमारास ही घटना घडली. घननिल मिशाळ असे त्याचे नाव आहे. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.या दुर्घटनेनंतर त्याला त्वरित उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याबाबत अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी जबाबदारी झटकत कंत्राटी कर्मचारी काळजी घेत नाहीत असं उत्तर दिल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

घननिल हा महावितरणचा कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा देत आहे. सेवा बजावताना विजेच्या खांबावरून शॉक लागून तो कोसळला. त्याला अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांना विचारलं असता ते म्हणाले, कर्मचारी काळजी घेत नाहीत. सेफ्टीकीट पुरवण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. तरीही आम्ही त्यांना ते कीट पुरवतो‌. त्याचा वापर केला जात नाही. याच प्रशिक्षण देखील कर्मचारी वर्गाला दिल आहे. मात्र, त्यांच्याकडून हलगर्जीपणा केला जातो असा आरोप त्यांनी केला.

याबाबत उपस्थित अधिकारी वर्गाला काम करत असताना विजेचा प्रवाह बंद नव्हता का अशी विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी हात वर केले. तर सेफ्टी कीट कार्यालयात असल्याच त्यांनी सांगितले. तर इतर प्रश्नांची उत्तर देण्याच टाळत तिथून निघून जाणं पसंत केलं. दरम्यान, तिथं उपस्थित दुसऱ्या अधिकाऱ्यास विचारलं असता आपणाला काही कल्पना नाही. याच उत्तर कुठे मिळेल याचीही कल्पना नाही असं उत्तर दिलं. अधिकाऱ्यांच्या या वर्तणुकीबाबत उपस्थित नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
दरम्यान, ही घटना घडताना प्रत्यक्षदर्शी असणारा कंत्राटी कर्मचारी म्हणाला, मी खाली उभा होतो. तेव्हा तो पोलवरून शॉक लागून खाली कोसळला. त्याच्या सेफ्टी कीटबद्दल मला कल्पना नाही. मी नुकताच इथे कार्यरत झालो आहे. कंत्राटी कर्मचारी पोलवर चढुन काम करताना महावितरणचा पर्मनंट कर्मचारी कुठे होता. हा प्रश्न देखील यामुळे उपस्थित झाला आहे. कुणाच्या मार्गदर्शनाने हे काम सुरू होतं तसेच विद्युत प्रवाह सुरू कसा राहिला अधिकारी, कर्मचारी अन् कंत्राटदार यात समन्वय नाही का हे प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

महावितरणचा अजब कारभार सुरू आहे. काल बांद्यात व आज सावंतवाडीत पोलवरून शॉक लागून पडल्याने कर्मचारी गंभीर झाले आहेत. जिल्हा नियोजन सदस्य तथा कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांची भेट घेत विचारपूस केली. आजवर ९ मुलं मयत पावलीत. अनेक जण अपघात होऊन घरी बसलेत. त्यामुळे उगाच अती करू नका, उद्रेक होईल असा इशारा त्यांनी महावितरणला दिला.
महावितरणचा हा गलथान कारभार असाच सुरू आहे यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे. आपण हा विषय सोडणार नसून पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यासमोर जिल्हा नियोजन बैठकीत मांडणार अस ते म्हणाले. कंत्राटी कर्मचाऱ्यांची जबाबदारी ना महावितरण ना कंत्राटदार घेत आहेत. त्यामुळे तुमची जबाबदारी सांगा, याबाबत निर्णय घ्या. अन्यथा गप्प बसणार नाही, असा इशारा अशोक सावंत यांनी दिला. उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच खडेबोल सुनावले.
अशोक सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणचा कारभार अजब आहे. बांद्यात कर्मचारी पोलवरून पडला. आज सावंतवाडीत घटना घडली. महावितरणचे अधिकारी जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. ज्याच्यावर प्रसंग येतो त्या कुटुंबाच दुःख या अधिकाऱ्यांना समजत नाही‌. त्यांना कोण वारस राहत नाहीत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी महावितरण अधिकाऱ्यांना सुचना केलेल्या आहेत. तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

साडेपाचशे कंत्राटी कामगारांची जबाबदारी त्यांनी घ्यावी यासाठी लक्ष वेधलं आहे‌. त्यांना एक महिन्यात न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. तज्ञ वायरम असतानाच कंत्राटी कर्मचाऱ्यांना पोलवर चढवाव. कारण, कंत्राटदारांना पोलवर चढवायचे अधिकार नाहीत. महावितरणचे अधिकारी सुद्धा तस सांगत आहेत. त्यामुळे या कंत्राटी मदतनिसाना वर चढवायचे की नाही यावर निर्णय घ्यावा. अन्यथा सगळे कर्मचारी एकवटून न्याय मागतील असं मत अशोक सावंत यांनी व्यक्त केले. ‌तर कोकणचे नेते खासदार नारायण राणे व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही या विषयाकडे लक्ष वेधून कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे असं सांगितलं.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!