कणकवली : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण पाच महिने आधीच फुल्ल झाले आहे. आता चाकरमान्यांची सारी मदार विशेष गाड्यांवर राहणार आहे. या गाड्यांची घोषणा होईपर्यंत कोकणवासीयांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यावर्षी ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी कोकणात जाण्याचे नियोजन केले जाते. भारतीय रेल्वेच्या नियमित रेल्वेचे तिकीट आरक्षण रेल्वे सुटण्याच्या १२० दिवस आधीच सुरू होते. त्यामुळे ४ सप्टेंबर रोजी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गाडीचे तिकीट ८ मे पासून काढण्यास सुरुवात झाली. गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आधी म्हणजे ४ सप्टेंबर रोजीचे तिकीट काढण्यासाठी कोकणवासीयांची प्रचंड धडपड सुरू होती.
मात्र, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण सुरू झाल्यानंतर काही मिनिटांत प्रतीक्षा यादीचे फलक लागून, प्रतीक्षा यादीची मर्यादाही संपल्याचे संदेश नागरिकांना दिसू लागले आहेत.