22 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

नारायण राणे यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक साधणार – विनायक राऊत

पोईप | संजय माने : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपने शेवटच्या क्षणी रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करून शिंदे गटावर अन्याय करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आपल्या समोर उभे ठाकलेले नारायण राणे यांना यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने पाणी पाजले असून आता लोकसभा निवडणुकीतही राणे यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक आम्ही साधणार, असे प्रतिपादन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघांचे इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी पोईप येथे बोलताना केले.

मालवण तालुक्यातील पोईप येथे गोपीनाथ पालव यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीचे उमेदवार खास. विनायक राऊत यांची प्रचार सभा पार पडली. त्यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत यांच्यासह आमदार वैभव नाईक, ठाकरे शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत, महिला आघाडी जिल्हा जिल्हासंघटक जान्हवी सावंत, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, संग्राम प्रभुगावकर, नितीन वाळके, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, बाळा आंगणे, दीपा शिंदे, निनाक्षी शिंदे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, जेम्स फर्नांडीस, मंदार ओरसकर, आशिष परब, संदीप कदम, अरुण भोगले पंकज वर्दम शिवरामपंत पालवआदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी विनायक राऊत म्हणाले, आपले विरोधी उमेदवार नारायण राणे प्रचारात सांगतात की विनायक राऊत यांनी दहा वर्षात काय केले ? तर मागील दहा वर्षात आपण सत्ता नसताना सुद्धा सरकारकडे पाठपुरावा करत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरघोस निधी उपलब्ध करून दिला, दुर्गम भागात सुद्धा मोबाईल टॉवर उपलब्ध करून दिले. विविध शाळांना निधीद्वारे इमारतींसाठी मदत केली. मात्र, केंद्रात उद्योग मंत्री असणाऱ्या नारायण राणे यांनी एक तरी उद्योग आणला का ? राणे यांनी फक्त आतापर्यंत आपलाच विकास कसा होईल हे पाहिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनताच नारायण राणे यांना त्यांची जागा दाखवून देईल, असेही राऊत म्हणाले.

यावेळी आम. वैभव नाईक म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने आणलेल्या सर्व योजना फसव्या आहेत. प्रत्येक निवडणुकीत काहीतरी वेगळं करायचे, नवीन आमिषे दाखवयाची आणि लोकांची मते घ्यायची, असे काम या सरकारने केले आहे. त्यामुळे आताच्या लोकसभा निवडणुकीत जनतेने भूलथापाना बळी न पडता डोळे उघडे ठेवून मतदान करावे, असेही ते म्हणाले. यावेळी गौरीशंकर खोत, हरी खोबरेकर व इतरांनीही विचार मांडले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!