समाजातील विविध विकासात्मक मुद्द्यावर केली चर्चा
राणे समाजाच्या विकासात्मक प्रश्नांवर अवश्य तोडगा काढणार असल्याचा दिला विश्वास
कणकवली : महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांची राणे समाज मंडळाने समाजातील विविध विकासात्मक प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी येथील हॉटेल नीलम कंट्री साईड येथे भेट घेतली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास रावराणे, उपाध्यक्ष भास्कर राणे, खजिनदार चंद्रशेखर राणे, सचिव मंगेश राणे, अनमोल रावराणे, तेजस राणे, अभय राणे, तातू राणे, हेमंत राणे, बाळकृष्ण राणे, चंद्रकांत राणे, औदुंबर राणे यांच्यासह राणे समाजातील बांधव उपस्थित होते.
दरम्यान यावेळी झालेल्या चर्चेमध्ये आपल्या समाजाच्या वतीने समाज मंदिर कम मंगल कार्यालय बांधण्यात यावे. त्याद्वारे आपल्या मंडळाची आर्थिक उन्नती सुद्धा साधता येईल व त्याचा वापर आपल्या समाजातील लोकांसाठी करता येईल. त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत आपण करू. आपल्या समाजातील आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या मंडळींच्या सार्वजनिक कार्यक्रमांना मदत करावी. आपल्याकडे पणन खाते असल्याने शेती मालासाठी आवश्यक असणारी कूलिंग व्हॅन आपण उपलब्ध करून देऊ. त्यामुळे आपल्या समाजातील व्यक्तींना रोजगार मिळू शकेल. आपल्या समाजातील शेतकरी बांधवांची एक FPO म्हणजेच सहकारी तत्त्वावर कंपनी तयार करून त्याद्वारे जिल्ह्यातील शेतीमाल वितरण व्यवस्था व खरेदी करून आर्थिक उन्नती साध्य करता येईल, त्यासाठी पुढाकार घेऊन असा गट तयार करावा. याबाबत लागणारी मदत करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या. त्याचप्रमाणे आपल्या समाजातील बांधवांसाठी मुंबईतील मंत्रालय येथे असलेले कार्यालय सदैव तत्पर असेल असेही सांगितले.
आपल्या समाजाचे पूर्ण राज्यभरात एकीकरण झाले पाहिजे, अशीही अपेक्षा मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली. यावेळी श्री. रावल यांनी राणे समाज मंडळाला आर्थिक मदतही देत असल्याचे जाहीर केले. मंत्री श्री. रावल यांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.