कणकवली – तंत्रज्ञानाच्या युगात मुलांचे भावविश्व सांभाळत, त्यांचे बालपण आनंदी बनवून त्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठी सक्षम व्यक्तिमत्व बनवणे हे पालकांसमोर आव्हान उभे आहे. यासंदर्भाचा विचार करून भविष्यात भावनिक, वैचारिक व संस्काराच्या दृष्टीने सक्षम पिढी घडावी, म्हणून वागदे येथील गोपुरी आश्रमाने ‘जीवन शिक्षण शाळेचा’ प्रयोग करायचे निश्चित केले आहे.
या प्रयोगाचे उद्घाटन पू. अप्पासाहेब पटवर्धन यांच्या जयंती दिनी ४ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. रविवारी १० नोव्हेंबर २०२४ रोजी या शाळेला प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. ही शाळा प्रत्येक महिन्यातील ‘रविवारी’ घेण्यात येणार आहे. मुलांच्या कलानुसार त्यांचा व्यक्तिमत्व विकास करून भविष्यात सक्षम पिढी घडावी, असा गोपुरी आश्रम परिवाराचा प्रयत्न आहे.
शाळेचा लाभ घ्यावा
कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकांनी आपल्या पाल्याच्या सक्षम विकासासाठी या शाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, सचिव विनायक मेस्त्री यांनी केले आहे.