गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते लोकार्पण
अमृत महोत्सवी वर्ष सामाजिक उपक्रमांनी साजरे करणार – संदिप मेस्त्री
कणकवली | मयुर ठाकूर : कलमठ ग्रामपंचायतीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १५ व्या वित्त आयोगातून कणकवली पोलीस ठाण्यानजीक वॉटर एटीएम सेवा सुरू करण्यात आली आहे. या वॉटर एटीएमचे लोकार्पण गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व माजी सभापती मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. कलमठ ग्रामपंचायत नेहमी उपक्रमशील असते, त्याचाच एक भाग म्हणजे आजचे वॉटर एटीएमचे लोकार्पण असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. १ रुपयात १ लिटर थंड स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रवासी व रिक्षा चालकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश बालावलकर, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, विस्तार अधिकारी संजय कवटकर, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवन, सदस्य नितीन पवार, पप्पू यादव, दिनेश गोठणकर, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, नजराना शेख, सचिन खोचरे, श्रेयस चिंदरकर, सुनील मेस्त्री, तेजस लोकरे, बाबू नारकर, ऋत्विज राणे समर्थ कोरगावकर, मंगेश मेस्त्री, किशोर परब, प्रथमेश धुमाळे, आबा कोरगावकर, श्रीकांत बुचडे, अण्णा सावंत, खुशाल कोरगावकर, गणेश सावंत, जयेश मेस्त्री, अमजद शेख व ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच संदिप मेस्त्री म्हणाले, कलमठ ग्रामपंचायतीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गावात गेल्या १५ दिवसांपासून अनेक उपक्रम राबवले जात असून वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये आरोग्य शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, महिलांसाठी कॅन्सर तपासणी, पथ नाट्य, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, माजी सरपंचांचा सत्कार, महिला उद्योग प्रशिक्षण सहल, पाककला स्पर्धा, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन अमृत महोत्सब वर्ष साजरे केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कलमठ गावात वॉटर एटीएम सेवा सुरू करत आहोत असे सांगितले. १५ दिवसात झालेल्या सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण १ मे रोजी महाराष्ट्र दिनी होणार असल्याचेही श्री. मेस्त्री यांनी सांगितले.