लाखोंचा ऐवज लंपास केल्याचा अंदाज
कणकवली : कणकवली शहरालगत असलेल्या कलमठ, बिडयेवाडी येथील चार बंद बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडले आहेत. हा चोरीचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. चोरट्यांनी बंगल्यांमधील सोन्याचे दागिने तसेच मौल्यवान वस्तू असा लाखोंचा एवज लंपास केला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संबंधित चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. मात्र, या बंगल्याचे मालक बाहेरगावी गेलेले असल्यामुळे कणकवली पोलिस ठाण्यात त्याबाबतची तक्रार रात्री उशिरापर्यंत दाखल झालेली नव्हती.
त्यामुळे चोरट्यांनी किती लाखांचा ऐवज लंपास केला त्याबाबतची अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. कलमठ, बिडयेवाडी येथील परिसरात बंद असलेले चार बंगले अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी फोडले. या बंगल्यांमध्ये प्रवेश करीत चोरट्यांनी आतील साहित्य अस्ताव्यस्त करत सोन्याचे दागिने व मौल्यवान वस्तूंची चोरी केली आहे. या बंगल्यांचे मालक बाहेरगावी असल्याने चोरीत किती मुद्देमाल गेला हे नेमके समजू शकलेले नाही. पोलिसांना या घटनेबाबत माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच बंगल्यांच्या मालकांना चोरीबाबत कल्पना दिली. ते मालक कलमठ येथे दाखल झाल्यावरच नेमका किती ऐवज चोरीस गेला ते समजू शकणार आहे.
कणकवलीत पुन्हा एकदा चोरटे सक्रिय झाले आहेत. बंद बंगल्याना त्यांनी लक्ष्य केले आहे. या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या चोरट्यांपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व कणकवली पोलिसांचे पथक सोमवारी दिवसभर बिडयेवाडी परिसरात ठाण मांइन होते.