आंबोली : सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या आंबोली घाटात आज सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आंबोली घाटातील एका वळणावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आले. यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे थांबली. सकाळी कामावर जाणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्या अनेकांना यामुळे अडकून पडावे लागले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि बांधकाम विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने रस्त्यावर आलेली दरड हटवण्याचे काम तातडीने सुरू केले आहे. या पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. पूर्ण मान्सून सुरू झाल्यावर अशा घटना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे आंबोली घाटातील धोकादायक ठिकाणी पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.