प्रथम स्मृतीदिनी मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना ; डबलबारी सामन्याला भजन रसिकांची उपस्थिती
कणकवली : असलदे गावातील विकास प्रक्रियेत व सरस्वती हायस्कुल नांदगाव या शैक्षणिक संस्थेच्या उभारणीमध्ये या गावचे माजी सरपंच कै. अंकुश डामरे यांचे मोठे योगदान होते. त्यांनी संपूर्ण जीवनात एक सामाजिक बांधिलकी करत केलेले काम आजच्या नव्या पिढीला एक प्रेरणादायी आहे. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम, समाजाप्रती ठेवलेली तळमळ आत्मसात करुया अशा शब्दांत कै. अंकुश डामरे यांच्या प्रथम समृतीदिनी मान्यवरांनी श्रध्दांजली वाहताना भावना व्यक्त केल्या.
असलदे डामरेवाडी येथे डामरे कुटुंबियांच्यावतीने कै. अंकुश डामरे यांच्या प्रथम स्मृतीदिनी श्रध्दांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके, उपसरपंच सचिन परब, सामाजिक कार्यकर्ते अनिल तांबे, पत्रकार नरेंद्र हडकर, उद्योजक सुरेश डामरे, सुनिल डामरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते अनिल तांबे म्हणाले, कै. अंकुश डामरे या व्यक्तिमत्तवाने त्यावेळी या गावासाठी केलेलं काम अतुलनीय आहे. म्हणून गावच्या ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच त्यानंतर या गावचे सरपंच विविध पदांवर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यासंधीतून गावाला पुढे नेणारे निर्णय कै. अंकुश डामरे यांनी घेतले , त्याचा फायदा आज गावाला होत आहे. चेअरमन भगवान लोके म्हणाले, कै. अंकुश डामरे यांनी त्याकाळात असलदे ग्रामपंचायत असेल किंवा सोसायटी इवलेशे लावलेले रोपटे विस्तारत आहेत. कदाचित त्यांनी सोसायटीचा वृक्ष त्यावेळी लावला नसता तर , मी आज चेअरमन राहिलो नसतो. त्यांनी निर्माण केलेल्या हायस्कुल मध्ये आमच्या गावातील मुलांना शिकता आले, असे दूरदृष्टीने काही निर्णय घेतले . त्यांचा आदर्श घेवून आम्ही आता पुढील वाटचाल करत आहे.
नरेंद्र हडकर म्हणाले , कै. अंकुश डामरे यांनी आपल्या जीवनात समाजाला फार महत्त्व दिले. सरस्वती हायस्कुल किंवा असलदे ग्रामपंचायत मध्ये त्यांनी केलेलं काम वाखाण्याजोगे आहे. समाज हितासाठी त्यांनी आपल्या कार्यकाळात वाटचाल केली.
जयराम डामरे यांनी आपले जीजी अद्यापही आपल्यात आहेत, तरी शरीराने गेले तरी त्यांचे विचार आपल्यासोबत कायम आहेत. तसेच या कार्यक्रमात सरपंच चंद्रकांत डामरे यांनीही श्रध्दांजली वाहिली.