कणकवली : शहरामध्ये ठिकठिकाणी विनापरवाना अनधिकृत बॅनर, पोस्टर्स, जाहिराती व घोषणा फलक उभारल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. जनहित याचिका १५५/२०११ अंतर्गत उच्च न्यायालायाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने कार्यवाहीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक १९/०५/२०२५ ते २३/०५/२०२५ या कालावधीमध्ये नगरपंचायतमार्फत विशेष मोहीम राबिवण्यात येणार आहे, अशी माहिती कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली. ही विशेष मोहीम राबवण्यापूर्वी विनापरवाना बॅनर अथवा होर्डिंग संबधितांनी परस्पर काढून घ्यावेत अथवा नगरपंचायतीची रीतसर परवानगी घेऊन त्यावर QR CODE लावावा. अन्यथा सदर विशेष मोहीम दरम्यान विनापरवाना बॅनर अथवा होर्डिंग आढळून आल्यास ते जप्त करुन संबधितांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
तसेच सदर व्यक्ती अथवा संस्थेवर महाराष्ट्र राज्य मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा १९९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. तरी सर्वांनी रीतसर परवानगी घेऊन बॅनर, पोस्टर्स, जाहिराती व घोषणा फलक लावावे असे आवाहन मुख्याधिकारी श्रीम. गौरी पाटील यांनी केले आहे.