सावंतवाडीत घडला प्रकार : आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर
सावंतवाडी : कर्जदाराला कोणतीही माहिती न देता त्याच्या नावे खोट्या सह्यांसह अंगठे लावून तब्बल २३ लाख ५० हजार रुपयांच्या कर्जाची उचल केल्याचा प्रकार पतसंस्थेत घडला आहे.
दरम्यान, हे कर्ज भरण्यासाठी तक्रारदार नीलेश सखाराम कडव याच्याकडे पतसंस्थेने तगादा लावल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. तसेच कडव यांची थकीत कर्जदार म्हणून वृत्तपत्रातून बदनामी करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी येथील न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने सावंतवाडी पोलिस ठाण्यात तब्बल २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील पंधरा जणांनी संशयित आरोपींनी जिल्हा न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, अर्ज न्यायालयाकडून नामंजूर करण्यात आला आहे.
सावंतवाडीतील एका पतसंस्थेत २७नोव्हेंबर २०१२ ते २०१६ या कालावधीत तक्रारदार नीलेश सखाराम कडत यांच्या नावे २३ लाख ५० हजार रुपये कर्ज उचल करण्यात आले होते. मात्र, या कर्जाची उचल करताना तक्रारदाराला कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. त्यांचे खोटे सही, अंगठे लावून खात्यातून सर्व पैसे काढून घेतले होते. याबाबत कडव यांनी सावंतवाडी न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर ३० जानेवारी २०२५ रोजी पोलिस ठाण्यात २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर सर्व संशयित आरोपींनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी सहायक सरकारी वकील रुपेश देसाई यांनी संशयित आरोपी हे चौकशीसाठी किती महत्त्वाचे आहेत, हे न्यायालयाला पटवून दिले. त्यानंतर न्यायालयाने सर्वाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.