पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास
शांत, सुव्यवस्थित वातावरणात उस्फूर्त मतदान केल्याबद्दल पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी मतदारांचे मानले आभार
कणकवली :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या सहकार्याचा विशेष उल्लेख करीत त्यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभारही मानले. येत्या २१ डिसेंबरला जेव्हा निकाल लागतील, तेव्हा भारतीय जनता पक्षाला चारही नगरपरिषदांमध्ये यश मिळेल, असा ठाम विश्वासही नाम. नितेश राणे यांनी कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही नगरपरिषद / नगर पंचायत निवडणुकांना मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विक्रमी मतदानाची नोंद केली आहे. जिल्ह्यात एकूण सरासरी ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले असून कणकवलीत ७९ टक्क्यांपेक्षा जास्त, सावंतवाडीत सुमारे ६५ टक्के, वेंगुर्ल्यात जवळपास ७१ टक्के आणि मालवणमध्ये साधारण ७० टक्के मतदान झाले आहे. शांत, सुव्यवस्थित वातावरणात पार पडलेल्या या मतदानाबद्दल जिल्हावासीयांचा गौरव करत पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानले आहेत.
मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने उत्तम समन्वय साधत मतदारांना सुरक्षित आणि निर्भय वातावरण उपलब्ध करून दिले. या पारदर्शक उपक्रमाचे कौतुक करताना ना. नितेश राणे म्हणाले की, ही लोकशाहीला बळ देणारी घटना असून सिंधुदुर्गवासीयांनी पुन्हा एकदा लोकशाहीची परंपरा जपली आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीबाबत बोलताना ते म्हणाले की, चारही नगरपरिषदांमध्ये पक्षाने ८१ नगरसेवक उमेदवार आणि चार नगराध्यक्ष पदांचे उमेदवार उभे केले होते. संघटना म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार उभे करणे आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढताना कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली, असे ना. नितेश राणे म्हणाले.
महायुतीतील वातावरणाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर ना. नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकारणाची एक संस्कृती आहे. निवडणुकीच्या काळात प्रत्येक पक्ष आपापली भूमिका मांडतो, परंतु वैयक्तिक पातळीवर कोणतेही मतभेद किंवा वाद निर्माण होत नाहीत. युती झाली नाही म्हणून आरोप – प्रत्यारोप वाढतात, मात्र निवडणूक संपताच सर्वांनी विकासाच्या दिशेने पावले टाकणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
सिंधुदुर्ग हा अधिकृत पर्यटन जिल्हा असल्याची आठवण करून देत ते पुढे म्हणाले की, जिल्ह्याची प्रतिमा पर्यटन, रोजगार आणि गुंतवणुकीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. निवडणुकीतून उद्भवलेल्या कोणत्याही घटना जिल्ह्याच्या प्रतिमेला धक्का देणार्या नसाव्यात. निवडणुकीचा कालावधी संपला आहे. आता सर्वांनी मिळून पुन्हा एकदा पर्यटनवाढ आणि जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सिंधुदुर्गातील मतदारांनी दाखविलेल्या लोकशाहीशीलतेचे आणि शांत मतदान प्रक्रियेचे कौतुक करत पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी पुन्हा एकदा संपूर्ण जिल्ह्याचे मनःपूर्वक आभार मानले.