कणकवली : महाराष्ट्रातील जनतेला ताठ स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. मराठी माणसाच्या न्याय-अधिकारांसाठी त्यांनी उभारलेला लढा हा फक्त संघर्ष नव्हता तर तो एक यशस्वी चळवळ होता. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनता त्यांना ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणून आजही गौरवते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रभरातून प्रेरणा, ऊर्जा आणि आत्मविश्वास साकारतो, असे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख व शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी व्यक्त केले.
कलमठ येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संदेश पारकर म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळालेलं बलाढ्य नेतृत्व पुन्हा होणे नाही. मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी दाखवलेल्या धैर्याचा वारसा आपण पुढे नेलाच पाहिजे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे नेतृत्व करत असून जनता देखील त्यांच्याबरोबर ठामपणे उभी आहे.
ते पुढे म्हणाले की, स्मृतिदिन हे केवळ औपचारिक कार्यक्रम नसून शिवसैनिकांमध्ये ऊर्जा, उत्कटता आणि विचारांची दृढता निर्माण करणारे क्षण आहेत. महाराष्ट्रातील मराठी माणूस बाळासाहेबांच्या विचारांवर एकजूट दाखवेल, हीच त्यांना खरी अभिवादनाची भावना.
कार्यक्रमाला माजी सरपंच धनश्री मेस्त्री, उपतालुकाप्रमुख जितू कांबळी, तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, तालुका संघटक राजू राठोड, जगन्नाथ आजगावकर, सी. आर. चव्हाण, सिकंदर मेस्त्री, ग्रामपंचायत सरपंच हेलन कांबळे, अनंत कदम, प्रवीण कोलगावकर, आशिष कांबळे, राजू राठोड यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.