पालकमंत्र्यांच्या रस्ते खड्डेमुक्त व झाडीमुक्त करण्याच्या सूचना
अधिकारी म्हणतात ते काम ठेकेदारांचे ?
कणकवली : हळवल ते कळसुली आणि कणकवली – परबवाडी – शिवडाव या मुख्य दोन मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेल्या झाडीझुडपांमुळे वाहनचालकांना धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हे रस्ते येत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊ सदरचा दोन्ही मार्गांवरील झाडी तातडीने हटवावी, अशी मागणी वाहनचालकांकडून व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेल्या झाडांमुळे रस्ता अरुंद झाला असून, अनेक ठिकाणी वळणावरून येणारी वाहने नजरेस पडत नाहीत. त्याचप्रमाणे या मार्गांवर मोठ्या प्रमाणात जंगली जनावरांचा वावर असल्याने प्रवास करणे धोक्याचे बनत चालले आहे. या मार्गावर अपघात झाल्यास जबाबदार कोण ? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
या संदर्भात अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु हे काम ठेकेदाराकडे असल्याचे सांगून अधिकारी वेळ मारून नेत आहेत. तसेच सदरचे “काम ठेकेदाराकडे आहे, त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत,” असे सांगून संबंधित अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत. परंतु अलीकडेच पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामीण भागातील रस्ते ‘खड्डेमुक्त आणि झाडीमुक्त’ करण्याच्या कणकवली येथे शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत सूचना दिल्या असताना देखील संबंधित ठेकेदारांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे प्रत्यक्षात दिसून येत आहे.