कणकवली : शंकर महादेव विद्यालय कुंभवडे प्रशालेची वर्षासहल कुंभवडे गावातील वारल्याचो काप आणि टाक्याचो काप या दोन धबधब्यांवर गेली होती. विद्यार्थ्यांनी अविस्मरणीय वर्षा सहलीचा आनंद घेतला. सकाळी ११वाजता विद्यार्थी आणि शिक्षक उत्साहात एकत्र जमले. वर्षा पर्यटन प्रवासाला सुरुवात केली. प्रवासात विद्यार्थ्यांनी विनोद आणि एकमेकांशी गप्पा मारल्या. ज्यामुळे प्रवासाचा आनंद द्विगुणित झाला.
निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याने सर्वांचे मन मोहून घेतले. पावसाने भिजलेली हिरवीगार झाडी, डोंगरावरून कोसळणारे धबधबे आणि धुंद वातावरणामुळे विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.
या सहलीमुळे विद्यार्थ्यांना निसर्गाच्या जवळ जाण्याची आणि पर्यावरणाचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली. शहरी जीवनातील धाव – पळीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेले हे क्षण विद्यार्थ्यांसाठी खूप आनंददायी आणि स्फूर्तिदायक ठरले. या सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकोपा वाढला आणि त्यांना एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता आले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका अपूर्वा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेचे सहाय्यक शिक्षक संदीप सावंत यांनी या सहलीचे नियोजन केले. ज्यामुळे ही सहल यशस्वी झाली. सर्व विद्यार्थ्यांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. अशा सहलींमुळे विद्यार्थ्यांना केवळ मनोरंजनाचाच नाही, तर नवीन गोष्टी शिकण्याचा आणि अनुभवण्याचाही आनंद मिळतो. एकंदरीत या सर्व नियोजनात शिक्षक रमेश लहारे, स्नेहल कदम, वृंदा सावंत, विनायक दळवी, सिद्धांत देसाई, मानसी कदम यांनी सहकार्य केले.