24 C
New York
Thursday, June 26, 2025

Buy now

जिल्ह्यातील अपप्रवृत्ती संपवायची असेल तर कै. श्रीधर नाईक यांचे विचार आत्मसात करणे गरजेच

कणकवली : श्रीधर नाईक यांच्यासारख्या सुसंस्कृत, विचारी माणसाची वाईट प्रवृत्तीच्या माणसांनी हत्या केली. मात्र, माणसे मारून विचार कधीही संपणार नाहीत. श्रीधर नाईक हे राजकारणात असतानाही मोठे समाजकार्य करत होते. तेच कार्य आज त्यांचे दोन्ही चिरंजीव सुशांत व संकेत नाईक, पुतणे वैभव नाईक व संबंध चालवत आहेत. जिल्ह्यातील अपप्रवृत्ती संपविण्यासाठी श्रीधर नाईक यांचे विचार सर्वांनी आत्मसात करण्याची गरज आहे, अशा शब्दांत विविधा मान्यवरांनी स्व. श्रीधर नाईक यांना आदरांजली वाहिली.

स्व. श्रीधर नाईक यांचा ३४ वा. स्मृतीदिन कार्यक्रम रविवारी येथील श्रीधर नाईक चौक येथे पार पडला. कार्यक्रमाला माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक, उबाठा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, महिला आघाडीप्रमुख नीलम सावंत – पालव, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईर्शाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उबाठा शिवसेना रत्नागिरी संपर्कप्रमुख सहदेव पेटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रसाद रेगे, श्रीधर नाईक यांचे चिरंजीव तथा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, द्वितीय चिरंजीव संकेत नाईक आदी उपस्थित होते.

श्रीधर नाईकांचे विचार पुढे जावेत विनायक राऊत म्हणाले, श्रीधर नाईक यांनी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले होते. दुर्दैवाने ते आपल्यात राहिले नसले तरी त्यांचे कार्य चिरंजीव सुशांत व संकेत नाईक पुढे नेत आहेत. श्रीधर नाईक यांच्याशी माझा तसा थेट संबंध आला नाही. पण, त्यांची हत्या झाली तेव्हापासून आतापर्यंत मी त्यांच्याविषायी खूप ऐकले आहे. एका विचारी, सुसंस्कृत माणसाचे जीवन विकृत, दानवी प्रवृत्तीने संपवले. श्रीधर नाईक यांनी आपल्या आयुष्यात विचारांची जोपासना केली. त्यांनी कित्येकांना मदतीचा हात दिला होता. अशा आधारकर्त्याला विखारी, निच प्रवृत्तीने संपवले. मात्र, नाईक कुटुंब आजही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जात आहे. कारण, हीच स्व. श्रीधर नाईक, स्व. विजय नाईक यांची पुण्याई आहे. मात्र आज सर्वत्र अविचारी, पैशांच्या जोरावर राजकारण सुरु आहे. अशावेळी श्रीधर नाईक यांचे विचार पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे.

वैभव नाईक म्हणाले, माझे काका श्रीधर नाईक यांनी त्यावेळी तरूणांचा झंझावात निर्माण केला होता. म्हणूनच ते ३० व्या वर्षी जिल्ह्याचे नेतृत्व करू शकले. त्या काळात त्यांनी अनेक तरूणांना घडवले, जे आज जिल्ह्यात ठिकठिकाणी नेतृत्व करत आहेत. श्रीधर नाईक यांची हत्या कुणी केली, हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे श्रीधर नाईक यांचे विचार आपण सोडले तर जिल्ह्यातील वाईट प्रवृत्ती कधीही संपणार नाही. श्रीधर नाईक यांनी स्वखर्चातून सामाजिक काम उभे केले होते. त्यांच्यासारखे कार्यकर्ते घडणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपण उद्विग्न होऊन चालणार नाही. त्यांची हत्या झाल्यानंतर आम्ही नाईक कुटुंबिय राजकारणातून बाजूला गेलो असतो तर श्रीधर नाईक यांचा विचार टिकला नसता. जय -पराजय होत असतात. मात्र, येथील वाईट प्रवत्ती संपविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया.

संदेश पारकर म्हणाले, गेली ३४ वर्षे श्रीधर नाईक यांचा स्मृतीदिन साजरा होत आहे. श्रीधर नाईक यांच्या जडणघडणीतील सर्व साथीदार या स्मृतीदिन कार्यक्रमाला आजही उपस्थित असतात. २२ जूनला एका नेत्याची हत्या झाली, एवढेच लोकांना माहीत आहे. पण, श्रीधर नाईक यांनी कशासाठी बलिदान दिले, त्यांचा संघर्ष काय होता, हे नव्या पिढीने जाणून घेण्याची गरज आहे. आज समाजाला संवेदनाच राहिल्या नसल्याने राजकीय अपप्रवृत्तींचे समर्थन केले जात आहे. वास्तविक श्रीधर नाईक यांचा विचार रुजला होता म्हणूनच जिल्ह्यातील जनतेने आपली सेवा करण्याची सलग दहा वर्षे आम्हाला संधी दिली. पण, ह्या दहा वर्षांत आम्ही जिल्ह्यातील अपप्रवृत्ती पूर्णपणे नष्ट करू शकलो नाही. त्यामुळे श्रीधर नाईक यांचे बलिदान व्यर्थ गेले, असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. श्रीधर नाईक यांचे विचार पुन्हा रुजविण्यासाठी आपल्याला खूप मोठा संघर्ष करावा लागेल. त्यांची हत्या हे केवळ नाईक कुटुंबाचेच नव्हे तर सर्व समाजाचे दुख व्हायला हवे. आपल्यावर आघात झाला त्यामधून नाईक कुटुंब सावरले असले तरी आता जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपल्याला मोठी लढाई लढावी लागणार आहे. श्रीधर नाईक यांची हत्या ही जिल्ह्यातील पहिली राजकीय हत्या होती. पण, माणसे मारून विचार कधीच संपणार नाही.

सतीश सावंत म्हणाले, श्रीधर नाईक यांच्या स्मृती वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांतून जोपासण्याचे काम नाईक कुटुंबिय व श्रीधर नाईक यांचे हितचिंतक करत आहेत. मी एनएसयूआयमध्ये काम करत असताना श्रीधर नाईक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले होते. त्यांच्याकडून सामाजिक बांधिलकीचा गुण शिकायला मिळाला. युवकांनी त्यांच्या गुणांचा बोध घ्यायला हवा. श्रीधर नाईक हे शेतकऱ्यांसह अनेकांना मदतीचा हात द्यायचे. तेच कार्य आज नाईक कुटुंबाने जोपासले आहे.

अमित सामंत म्हणाले, आज या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती पाहूनच श्रीधर नाईक यांच्या कार्याची जाणिव होते. त्यांच्यासोबात काम केलेले प्रसाद रेगेंसारखे पदाधिकारी सांगतात की श्रीधर नाईक हे वादळ होते. त्यावेळी जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकहाती झेंडा त्यांनी रोवला होता. आज दुर्दैवाने त्यांच्या हत्येला ३४ वर्षे झाली. मात्र, जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती चिंताजनक आहे. मात्र, श्रीधर नाईक यांच्या कार्याचा वारसा सुशांत, संकेत, वैभव नाईक चालवत आहेत, ही लक्षणीय बाब आहे. श्रीधर नाईक राजकारणी असूनही समाजकारणी होते.

ईर्शाद शेख म्हणाले, श्रीधर नाईक यांचा स्मृतीदिन गेली ३४ वर्षे मोठ्या गर्दीत साजरा होत आहे, हीच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. आपल्या छोट्या आयुष्यामध्ये त्यांनी कित्येकांना मदतीचा हात दिला होता. त्यांनी जे कार्य केले ते कधीही विसरता येण्यासारखे नाही. राजकारणात असतानाही त्यांनी समाजाकारणाचा वसा घेतला होता. आज नाईक परिवार त्यांचे कार्य पुढे नेत आहेत, ही उल्लेखनिय बाब आहे. अर्थात श्रीधर नाईक यांचे विचार पुढे घेऊन जाणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. श्रीधर नाईक यांची हत्या करणारी प्रवृत्ती जिल्ह्यामध्ये राहता कामा नये, अशी आपणा प्रतिश्रा करूया.

प्रास्ताविकात सुशांत नाईक म्हणाले, स्व. श्रीधर नाईक यांचा स्मृतीदिन आम्ही केली ३४ वर्षे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करत आहोत. सामाजिक कार्याचा वसा आम्हाला, आजोबा दाजी नाईक यांच्याकडून मिळाला. तोच वारसा वडील श्रीधर नाईक, काका विजय नाईक, मुरलीधर नाईक यांनी चालवला. श्रीधर नाईक, विजय नाईक यांनी त्यावेळी कित्येकांना रोजगार मिळवून दिला. ३६ व्या वर्षी माझ्या वडिलांची निघृण हत्या झाली. पण, त्यांचे सहकारी, मित्र, हितचिंतक एकत्र येऊन येथे त्यांचा पुतळ स्थापन करतात व सलग ३४ वर्षे स्मृतीदिन कार्यक्रम साजारा होतो, ही समाधानाची बाब आहे. श्रीधर नाईक यांचे विचार रुजले तरच जिल्ह्यातील वाईट विचारांचा नाश होईल. स्मृतीदिनानिमित्त दिवसभरात विविध सामाजिक उपक्रम पार पडले. यात रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थी, प्रगतीशील शेतकरी गौरव असे विविध उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश पवार यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!