देशाच्या सैन्य दलाबद्दल सिंधुदुर्गवासीय जनतेला अभिमान
केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या आवाहनांचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे
कायद्याच्या चौकटीत राहून तिरंग्याची रॅली काढली जात असल्यास जिल्हा प्रशासन सहकार्य करेल ; पालकमंत्री नितेश राणे
कणकवली : ११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मालवण राजकोट येथील शिवपुतळ्याचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले असणार आहेत. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरती करणार आहेत. राजकोट किल्ल्यानजीक सिंधुरत्न समिती अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेनुसार शिवसृष्टी उभारली जाणार आहे. राजकोट किल्ला भेटीनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्र राजे भोसले करंजे येथील गोवर्धन गोशाळेच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिली. कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री ना. नितेश राणे बोलत होते.
पुढे ते म्हणाले, देशाच्या सैन्य दलाबद्दल सिंधुदुर्गवासीय जनतेला अभिमान आहे. देशात जी युद्धजन्य स्थिती आहे त्यादृष्टीने सिंधुदुर्गवासीयांशी संवाद साधत आहे. केंद्र सरकारकडून जी आवाहने केली जात आहेत, त्यांचे पालन आपण नागरिक म्हणून करायला हवे. मॉकड्रिलमध्ये प्रशासनाने आलेल्याला मार्गदर्शन केले. जनताही त्यात सहभागी झाली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपला देश अतिरेक्यांच्या विरोधात लढा देत आहे. अतिरेक्यांनी निष्पाप पर्यटकांना पहलगाम मध्ये मारले. मोदी सरकारने या अतिरेक्यांविरोधात मोहीम उघडली आहे. अतिरेक्यांविरोधात मोठा हल्ला करण्याचे काम लष्कर करत आहे.
भारताचे नागरिक म्हणून आपण सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमांतून सैन्य दलाचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे. आपल्याकडून लष्कराचे खच्चीकरण होईल असे काहीही करू नये. कायद्याच्या चौकटीत राहून तिरंग्याची रॅली काढली जात असल्यास जिल्हा प्रशासन सहकार्य करेल. नागरिकांनी रक्तदान शिबिर आयोजित करून त्यात मोठ्या संख्येने सभाग देखिल घ्यावा. त्याचप्रमाणे सैन्य दलाचे अभिनंदन सिंधुदुर्ग वासीयांनी करावे. सिंधुदुर्गातील जनता राज्य आणि केंद्र सरकार तसेच प्रशासनाला सहकार्य करेल हा विश्वास आहे. भारतीय नौदलकडून सागरी हद्द आणि मच्छी मच्छिमारांना निर्देश दिले आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या नियमावलीचे तंतोतंतपालन मच्छिमार बांधवांनी करावे. कोणत्याही प्रकारचा अतिउत्साही पणा न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय आणि बंदर खात्याचे मंत्री म्हणून पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले आहे.