भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य ; पालकमंत्री नितेश राणे
सिंधदुर्ग : आंगणेवाडी येथे विविध ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेदरम्यान भाविकांना सर्व सोयी सुविधा पुरविणे आवश्यक आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिकचा पोलिस बंदोबस्त पुरवावा तसेच सर्व परीसरात सीसीटीव्ही लावावेत. यात्राकाळात भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
आंगणेवाडी यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी आंगणेवाडीत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसिलदार वर्षा झाल्टे यासंह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, स्थानिक देवस्थान समितीला प्रशासनाकडून आवश्यक ती मदत दिली जाईल. भाविकांना सुलभ दर्शन देताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने जादा कुमक तैनात करावी, परिसरात अधिक प्रमाणात सीसीटीव्ही लावावेत, मंदिर परिसरावर ड्रोनव्दारे नजर ठेवावी, प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसेसची व्यवस्था करावी, आपत्ती काळात गर्दीतून रुग्णवाहिका जाण्यासाठी आणि लवकरात लवकर बाहेर जाण्यासाठीचा मार्ग यावर आरोग्य विभाग आणि आरटीओ यांनी संयुक्त बैठक करून त्यावर नियोजन करण्यात यावे. तसेच व्हीआयपी आल्यावर सर्व सामान्यांना त्रास होता नये याचीही खबरदारी घेण्यात यावी. कोणत्याही प्रकारे भावकिांची गैरसोय होणार नाही याची सर्व विभागांनी दक्षता घ्यावी. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विशेष काळजी घ्यावी, आंगणेवाडी यात्रेला दरवर्षी भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता वीज वितरण, मोबाईल नेटवर्क, आरोग्य, पाणीपुरवठा, यासंह आवश्यक महत्वाच्या सर्व समस्यांवर पुढच्या यात्रेपर्यंत कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी आंगणेवाडीत आढावा बैठकीत दिली.