ब्युरो न्यूजः महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती आहे. महाराष्ट्रात शिवरायांची जयंती एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरी केली जाते. राज्यातच नाही तर सर्व देशभर शिवरायांची जयंतीचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होतो. आजच्या ३९५ व्या जयंती निम्मित अनेक राजकीय नेतेमंडळींकडून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर मराठीतून पोस्ट करत शिवरायांना विनम्र अभिवादन केले आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शिवजयंतीच्या दिवशी गंभीर चूक केली असल्याचे समोर आले आहे.
नेहमीच वादग्रस्त विधानामुळे संपूर्ण देशात चर्चेत असलेले काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या बद्दल संतापाची लाट पसरवली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांना चक्क श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.