संघर्ष समितीच्या मोर्चाला यश; कुडाळ येथे आयोजित मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद…
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणच्या माध्यमातून लावण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरच्या विरोधात आज वीज ग्राहक संघर्ष समितीच्यावतीने कुडाळ येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी अदानी आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत आपली लढाई सुरू राहणार असल्याचा इशारा माजी आमदार वैभव नाईक व संघर्ष समितीचे पदाधिकारी संपत देसाई यांनी दिला. दरम्यान मोर्चाची दखल घेत पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात स्मार्ट मीटरचे काम बंद राहील असे, आश्वासन उपस्थित कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांनी दिले. यावेळी “अदानी गो बॅक”, “फडणवीस सरकारचा निषेध असो”, स्मार्ट मीटर रद्द झालेच पाहिजेत, कृषी पंपाला वीज मिळालीच पाहिजेत, महावितरणचे खाजगीकरण रद्द झालेच पाहिजेत असे हातात फलक घेत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत स्मार्ट मीटर विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी कुडाळ महिला रुग्णालय ते महावितरण कुडाळ अधिक्षक अभियंता कार्यालयावर जोरदार धडक देत आंदोलन छेडले. त्यापूर्वी महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात कुडाळ येथील महिला हाॅस्पिटल समोर मोर्चासाठी वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संपत देसाई, माजी आमदार वैभव नाईक, काॅग्रेस जिल्हाध्यक्ष ईर्षाद शेख, राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, बाबुराव धुरी,सुनील शिंत्रे, संदेश पारकर आदिसह प्रमुख मंडळी व वीजग्राहक एकत्रित झाले. यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले की ,आज प्रथमच असं घडतेय ते अदानीच्या माणसांना महावितरणच्या प्रत्येक कार्यालयात बसण्यासाठी स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. त्यामुळे हा सर्वांना धोक्याचा इशारा आहे. महावितरणची सर्व यंत्रणा अदानीच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे. अदानीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला मीटर साठी १ हजार रुपयाचा फटका आपल्याला बसणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हिंदू बाबत बोलत आहेत.तर मग आपले हे वीज ग्राहक हिंदू नाहीत का ? हे जनतेचे प्रश्न आहे,संपत देसाई तुम्ही हा प्रश्न हाती घेतला हे चांगले झाले, आम्ही घेतला असता तर त्याला राजकीय किनार लागली असती. आता सर्वानी एकजुटीने विरोध करुया असे आवाहन वैभव नाईक यांनी केले. यावेळी संपत देसाई म्हणाले की, स्मार्ट मीटर हे सामान्य ग्राहकाला बसवले जाणार नाहीत असे तत्कालीन ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी सांगितले होते. पण प्रत्यक्षात आता वस्तुस्थिती वेगळी आहे. कोल्हापूर किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात अदानीने आपली स्वतंत्र यंत्रणा उभी केलेली आहे, त्याच्या विरोधात आजचा हा आपला एल्गार आहे, हे सरकार अदानी चालवतो. यांना निवडून येण्यासाठी अदानीने भरमसाठ पैसा दिला आहे.अदानी जे सांगेल ते हे सरकार करत आहे. केंद्र किंवा राज्य हे दोन्ही सरकारी अदानीच चालवत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काहीच सुरक्षित नाही. एकेक करत सर्व संस्थां अदानीच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. आम्ही ज्यांना निवडून दिले ते लोकप्रतिनिधी आता कुठे आहेत? ते अदानीचे तळवे चाटत आहेत, अदानी सांगेल तसेच ते वागत आहेत. अदानीचे सर्वजण गुलाम झाले आहेत.या गुलामांना धडा शिकविल्याशिवाय जनता स्वस्त बसणार नाही.आता ही लढाई भांडवलदारांच्या विरोधात आहे, ही आमची लढाई न्याय मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. कोल्हापूर मधून स्मार्ट मीटर विरोधातील या आंदोलनाला सुरुवात झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन लवकरच हे आंदोलन संपुर्ण कोकणभर पेटेल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी अमित सामंत म्हणाले की, आताच झालेल्या निवडणूका ह्या गैर मार्गाने जिंकल्या गेल्या, चुकीची आश्वासन देऊन जिंकल्या गेल्या. आता अदानीच्या घशात महावितरण कंपनी घालण्याचा डाव सुरू आहे, सर्वसामान्य जनतेसाठी हा फार मोठा धोका आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरच्या विरोधात सर्वांनी एकजुटीने लढणे आवश्यक आहे. अदानी आणि अंबानीच्या घशात आपला महाराष्ट्र जाऊ न देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सामंत यांनी सांगितले. इर्षाद शेख म्हणाले की, आपला ग्राहक चांगल्या पद्धतीने वीज बिल भरणा करतो तर मग अशा प्रकारचे स्मार्ट मीटर बसवण्याचे कारण काय? स्मार्ट मिटरची ही यंत्रणा अदनीला देण्यात आलेली आहे. आता या मीटर मध्ये रिचार्ज संपले की लाईट बंद होणार आहे; म्हणजेच एक प्रकारची जनतेची लुट मोठ्या प्रमाणात होणार आहे. ही लढाई नेत्यांची किंवा कुठल्या पक्षाची नाही तर प्रत्येक वीज ग्राहकाची आहे.या लढ्याला आज सुरुवात झालेली आहे.अदानीचा करार रद्द होत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार आहे असे ईर्षाद शेख यांनी सांगितले. यावेळी संदेश पारकर, सुनिल शित्रे, मंगेश तळवणेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित सर्व प्रमुख मंडळी कुडाळ महिला रुग्णालय ते महावितरण अधिक्षक कार्यालयापर्यंत हातात फलक देत घोषणाबाजी करत मार्गक्रमण केले. यावेळी अधिकाऱ्यांशी प्रमुख मंडळींनी संवाद साधला. माजी आमदार वैभव नाईक यांनी अधीक्षक अभियंता उपस्थित न राहिल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी उपस्थित राहिलेले कार्यकारी अभियंता अरविंद वनमारे यांना आंदोलकांनी धारेवर धरले. आंदोलनाची तीव्रता पाहून श्री.वनमोरे यांनी काही वेळातच आंदोलकांना सिंधुदुर्गात सुरू असलेले स्मार्ट मीटरचे काम पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्यात येईल,असे लेखी पत्र दिले त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी अभय शिरसाट,विद्याप्रसाद बांदेकर, मंदार शिरसाट, अमरसेन सावंत, विजय प्रभू, संतोष शिरसाट, शिवाजी घोगळे, सौ.श्रेया परब, मंगेश तळवणेकर, सौ.अक्षता खटावकर,गंगाराम सडवेलकर,अतुल बंगे,श्रेया गवंडे, सचिन काळप,उदय कुडाळकर,मथुरा राऊळ,अनघा तेंडोलकर आदीसह मोठ्या प्रमाणात वीज ग्राहक उपस्थित होते.