कणकवली : जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक ५ येथे पालक आणि विद्यार्थ्यांकरीता संविधानावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भारतीय संविधान या विषयावर बोलताना प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी संविधानाची निर्मिती आणि जीवनातील आवश्यकता उलगडवून सांगितली. संविधानातील मूल्यांचा आदर करून आणि आपण त्यांचा आपल्या जीवनात अंगीकार केला तर आपले जीवन सुखकर होणार आहे ज्याप्रमाणे दैनंदिन जीवनात आपण छोटे छोटे नियम पाळत जगत असतो, तसेच आपल्या सार्वजनिक जीवनात देखील नियमांची आवश्यकता असते. आपले जीवन शिस्तबद्ध असावे. आपल्यामुळे इतर कोणाची हानी होऊ नये याकरिता संविधानाने काही नियम कायदे करून दिलेले आहेत. आपण त्याचे पालन केले पाहिजे. शालेय जीवनातच विद्यार्थी घडत असतात या जीवनातच विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व कळाल्यास ते देशाचे भावी नागरिक म्हणून यशस्वी होतील. देश घडविण्यासाठी महात्मा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या थोर व्यक्तींनी आपले आयुष्य वेचले आहे व देश तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हाती सोपवला आहे. तुम्ही तुमच्या भावी आयुष्यात या महान व्यक्तींची चरित्रे वाचा. तसेच प्रत्येक घरात संविधान असणे गरजेचे आहे आणि त्या संविधानाचे वाचन करणेही गरजेचे आहे.
यावेळी शाळा कणकवली क्रमांक पाच व अंगणवाडीचे पालक, विद्यार्थी,माजी विद्यार्थी, शाळा स्थापन समिती सदस्य, माता, पालक सदस्य, शिक्षक पालक सदस्य,ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापक कल्पना मलये यांनी प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांचे स्वागत केले. उपशिक्षिका शर्मिला चव्हाण यांनी आभार मानले.