कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लागणार निधी निश्चितपणे उपलब्ध करून देऊ
कणकवली पर्यटन महोत्सवाचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
कणकवली | मयुर ठाकूर : सिंधुदुर्गात पर्यटन महोत्सव आणि त्यातून जिल्हा पर्यटनाला आणि आर्थिक उलढालीला चालना देणे याची सुरुवात माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे खा. नारायण राणे यांनी केली. त्यामुळे राणे कुटुंबाची कणकवली शहरामुळे ओळख आहे. कणकवली चे नाव राज्यात आणि देशात उंचावण्याची जबाबदारी आमची आहे. पर्यटन कणकवली पर्यटन महोत्सवच्या माध्यमातून टीव्हीवर दिसणारे देशातील दिग्गज कलाकार प्रत्यक्ष पहाणे, त्यांची कला प्रत्यक्ष पाहण्याची संधी जनतेला मिळते. कणकवली पर्यटन महोत्सव आता ब्रँड तयार झाला आहे. कणकवली नगरपंचायतची सत्ता माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मागताना कणकवली शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा शब्द दिला होता. तो शब्द आम्ही पाळला आहे, याची प्रचिती कणकवली शहरात फिरताना जनतेला येत आहे.
आता मंत्री झाल्यामुळे कणकवली च्या विकासाच्या केवळ नियोजन आराखडा बनवा, लागेल तो निधी देण्याची जबाबदारी माझी आहे. केवळ आमदार असताना पोदार इंटरनॅशनल स्कुल, जाणवली नदीवरील पूल, कणकवली रेल्वे स्टेशन सुशोभीकरण, गार्डन, स्पोर्ट्स कॅम्प्लेक्स, डीपी रोड, रिंग रोड चे जाळे उभारले. आता पुढील पाच वर्षांत विकासाचा आणखी पुढील टप्पा गाठण्याचा आमचा संकल्प आहे.
नगरपंचायत निवडणुका लागतील. तेव्हा विरोधक जागे होतील. पण आम्ही मात्र कणकवलीकरांच्या सेवेत कायम होतो आणि असणार. केंद्रात राज्यात सत्ता आहे. खासदार देखील नारायण राणे आहेत. मी स्वतः कॅबिनेट मंत्री आहे. सिंधुदुर्ग वर प्रेम करणारे आपले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कणकवली शहराच्या न भूतो अशा विकासासाठी निधीची कमतरता कधीच भासणार नाही असे मंत्री ना. नितेश राणे यांनी सांगितले.
कणकवली पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते तर जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील, भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगरसेवक संजय कामतेकर, अभि मुसळे, विराज भोसले, बाबू गायकवाड, शिशिर परुळेकर, माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, प्राची कर्पे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना समीर नलावडे म्हणाले की, २००८ साली जेव्हा माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली नगरपंचायत ची सत्ता जनतेने निवडून दिली. तेव्हा खा. नारायण राणे यांनी कणकवली शहरात पर्यटन महोत्सव व्हायला पाहिजे. तेव्हापासून सत्ता असो किंवा नसो पर्यटन महोत्सव चे आयोजन करत आहोत. या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून कणकवली शहरातील स्थानिकांना रोजगार मिळत आहे. केवळ आमदार असताना मंत्री ना. नितेश राणे यांनी कणकवली शहराचा कायापालट मागील पाच वर्षात केला आहे. आता ना. नितेश राणे हे कॅबिनेट मंत्री आहेत. आता कणकवली शहराचा जलदगतीने विकास होईल.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. तर आभार प्रदर्शन माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्षा कै. सायली मालंडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.