जिल्हा परिषदेच्या ३१ जागा भाजप तर शिवसेना १९ जागा लढणार
कणकवली :जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणार असून या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीला शंभर टक्के यश मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुती अंतर्गत भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदेसाठी ३१ तर पंचायत समितीसाठी ६३ जागा लढवणार आहे. तर शिंदे शिवसेना जिल्हा परिषदेसाठी १९ आणि पंचायत समितीसाठी ३७ जागा लढवणार आहे. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष पदा भाजपकडे ३ वर्षे आणि शिवसेनेकडे २ वर्षे असा फॉर्म्युला राहील, असेही खा. नारायण राणे यांनी स्पष्ट केले.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी महायुतीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी खास. नारायण राणे बोलत होते. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सचिन वालावलकर, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
खास. नारायण राणे यांनी जिल्हा परिषद आणी पंचायत समिती च्या जागा वाटपाची घोषणा केली. यामध्ये विधानसभा निहाय जागा वाटप पुढीलप्रमाणे –
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ :
भाजप – जिल्हा परिषद ११, पंचायत समिती १७
शिंदे शिवसेना – जिल्हा परिषद ६, पंचायत समिती १७
कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघ :
भाजप – जिल्हा परिषद ४, पंचायत समिती १५
शिंदे शिवसेना – जिल्हा परिषद ११, पंचायत समिती १५
कणकवली विधानसभा मतदारसंघ :
भाजप – जिल्हा परिषद १६, पंचायत समिती ३१
शिंदे शिवसेना – जिल्हा परिषद २, पंचायत समिती ५
राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रस्ताव प्राप्त झाला असून, त्यांचाही विचार करून या प्रक्रियेत सामावून घेतले जाईल, असेही खास. नारायण राणे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी युती यशस्वीपणे सुरू असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जिल्हा परिषद निवडणुकीत ही युती यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महानगरपालिकेच्या निकालाप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर राहील. विरोधकांकडे वाद घालायला किंवा आव्हान देण्याइतकी ताकद नाही. जिंकण्यासाठी विरोधकांना जागाच शिल्लक ठेवलेल्या नाहीत, असा दावाही त्यांनी केला. निश्चित झालेले उमेदवार सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही खास. नारायण राणे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांनी भेट घेऊन चर्चा केली असून रत्नागिरीत जागा लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. काहींनी अधिक जागांची मागणी केल्याने त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंना नफा तोटा काय होतो हे महानगरपालीकेच्या निकालानंतर समजले असेल. सुरुवातीला एकत्र होते तेव्हा काय केलं नाही, वेगळे झाले तेव्हा काय करू शकले नाही, आणि आता परत एकत्र येऊन काय करू शकले नाहीत. संजय राऊत ला काही शिल्लक राहिले नाही. त्यांना काही बातमी राहिली नाहीय. उद्धव ठाकरेंनी देवाला कधी हात जोडले नाही. आता कसे होईल. उद्धव ठाकरे जे बोलतात ते वास्तव नाहीय. भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी च बहुमत आहे. घरी बसून काय ऑपरेशन करून घ्यायची आहेत ते करून घ्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका घेतली त्याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा. आम्ही सुद्धा त्यासाठीच बाहेर पडलो अशा शब्दात ठाकरेंवर देखील प्रहार केला.