शेत तळ्याच्या बांधावरून पाय घसरून पडल्याने मृत्यु
तो मृतदेह आयनल येथील बुद्धीवान चव्हाण यांचा
कणकवली : तालुक्यातील आयनल गावातील बुद्धीवान भोरु चव्हाण ( वय ६३ रा. आयनल मनेरवाडी ) हे गावातील खानावळीमध्ये जेवण करिता जातो असे सांगून सोमवारी ( १८ ऑगस्ट ) रोजी सकाळी १० वा. च्या. सुमारास घरातून निघून गेले होते. मात्र बराच वेळ ते घरी न आल्याने घरातील व गावातील लोकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा ठाणपत्ता लागला नव्हता. बराच वेळ शोधाशोध झाल्यावर दुसऱ्या दिवशी ( मंगळवारी ) बुद्धीवान भोरु चव्हाण यांचा एका शेततळ्याच्या पाण्यात मृतदेह तरंगताना सापडला.
याबाबत मनोहर भोरु चव्हाण ( वय ६१ रा. आयनल मनेरवाडी ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मयत बुद्धिवान भोरु चव्हाण हा आमचे काजूचे बागेतील काम करुन घरी परत येत असताना अतिजोराच्या पावसामुळे शेततळीच्या बांधावरुन चालताना पाय घसरुन शेततळीच्या पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्य झाला. या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे यांच्यासह पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे करत आहेत.