बालगोपाळ हनुमान मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली
कणकवली : तालुक्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. लागोपाठ आठ दिवसाचा कालावधी सोडून सलग चार ते पाच चोऱ्या आजपर्यंत झाल्या. परंतु एकही चोरीच्या घटनेतील चोरटे अद्याप पर्यंत पोलिसांच्या हाती लागलेले नाही. या घटना ताज्या असतानाच शहरातील भालचंद्र महाराज आश्रम संस्थान लगतच्या बालगोपाळ हनुमान मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे. ही घटना रविवारी सकाळी स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. मंदिरातील फंडपेटीचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी आतील रोकड लंपास केली आहे. त्याचबरोबर कडी कोयंडा तोडण्यासाठी आणलेली काटवणी घटनास्थळी टाकून चोरट्यांनी पलायन केले असल्याचे दिसून आले. या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद नव्हती. मात्र दिवसेंदिवस वाढत असलेल्या चोरीच्या घटनांनी तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.