त्यांना वरिष्ठांनी समज द्यावी ; अशी वक्तव्य खपवून घेणार नाही
कणकवली : महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी त्यांची पक्ष संघटना वाढीसाठी मेळावे जरूर घावेत. मात्र त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांनी बोलताना तारतम्य बाळगून बोलावे. आपण महायुतीत आहोत, याची जाण ठेवत मतभेद निर्माण होतील अशी वक्तव्ये करू नयेत. ती खपवून घेतली जाणार नाहीत असे भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी म्हटले आहे.
भरत गोगावले यांनी शनिवारी कुडाळ येथे झालेल्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने श्री मेस्त्री यांनी म्हटले आहे की, राज्यात महायुती सरकार आहे, याचे भान ठेवणे गरजेचे आहे. नारायण राणे हे भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच यशस्वी माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री म्हणून काम केलेले नेते आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती म्हणून आपण एकत्र काम करत असताना प्रसिद्धीसाठी नाहक गैरसमज निर्माण करणारी वक्तव्ये करू नयेत. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडून गालबोट लागू शकते याची जाणीव शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी श्री गोगावले यांना करून देऊन त्यांना योग्य ती समज द्यावी. अशा प्रकारचे वक्तव्य पुन्हा केल्यास ते कदापि खपवून घेतले जाणार नाही.