वेंगुर्ले : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, वेंगुर्ला शाखेच्या वतीने मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या “दत्तक पालक” उपक्रमांतर्गत तालुक्यातील होतकरू, अभ्यासू आणि आर्थिक परिस्थिती नसलेल्या एकूण ४२ विद्यार्थ्यांना तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. वेंगुर्ले येथील साई डिलक्स सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षक समितीचे राज्य महासचिव राजन कोरगांवकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, सरचिटणीस तुषार आरोसकर, वैभवी कसालकर, शिक्षक नेत्या सुरेश कदम, तालुकाध्यक्ष प्रसाद जाधव, सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर, राज्य प्रतिनिधी सचिन मदने, नामदेव जांभवडेकर, निलम बांदेकर, शंकर वजराटकर, कोकण विभाग सचिव संतोष परब, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष निकिता ठाकूर, सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे, उपाध्यक्षा ऋतुजा जंगले, शिक्षक पतपेढी वेंगुर्ला संचालक सीताराम लांबर, ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष योगेश तांडेल आदी उपस्थित होते. शिक्षक समितीच्या या उपक्रमाबद्दल तहसीलदार ओतारी यांनी कौतुकोद्गार काढले. वेंगुर्ला शाखेचे कार्य इतर संघटनांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जयप्रकाश चमणकर यांनी केले. तर प्रसाद जाधव यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही केवळ शिक्षकांची संघटना नसून शिक्षण व्यवस्थेतील परिवर्तनाची, शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवणारी आणि गरजू विद्यार्थ्यांना आधार देणारी एक शक्ती असल्याचे सांगितले. याच कार्यक्रमात नवनियुक्त शिक्षकांना ओळखपत्र वितरण, सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान आणि दहावी-बारावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक नेते सीताराम नाईक यांनी केले. भूषण नाईक व प्राजक्ता आपटे यांनी सूत्रसंचालन केले. तर सचिव रामा पोळजी यांनी आभार मानले.