खा. नारायण राणे यांच्या संकल्पना पालकमंत्री म्हणून पूर्णत्वास नेणार
कणकवली ( मयुर ठाकूर ) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकासाच्या दृष्टिकोनातून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून खासदार नारायण राणे यांची जी काही स्वप्ने आहेत, ज्या काही संकल्पना आहेत त्या पूर्ण करण्याचं काम जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सिंधुदुर्गात आगळेवेगळे वातावरण निर्माण झाले आहे. परत एकदा जिल्ह्याच्या राजकारणात कणकवली हे केंद्रबिंदू झालेला आहे. २०२९ पर्यंत जेव्हा या सरकारला पाच वर्षाच्या कालावधी पूर्ण होईल तेव्हा पर्यंत आपला सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील पहिल्या तीन क्रमांकावर आणून दाखवेन असा विश्वास पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत, माजी जि.प. अध्यक्षा संजना सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, प्रकाश सावंत, वागदे सरपंच संदीप सावंत, आशिये सरपंच महेश गुरव, समीर प्रभूगावकर, विठ्ठल देसाई, नामदेव जाधव, प्रज्वल वर्दम, पप्पू पुजारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, गेले दहा वर्ष माझा वाढदिवस माझे सहकारी जोमाने आणि उत्साहाने साजरा करत आहेत. पण यावर्षीचा वाढदिवस थोडा वेगळा होता. एक वेगळं वातावरण वाढदिवसाच्या निमित्ताने पाहायला मिळालं. राजकारणाच्या पलीकडे खासदार नारायण राणे यांनी जोडलेली नाती आणि संबंध देखील आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळपास दीडशे दिवसांपेक्षा जास्त दिवस सरकारला झाले. तुम्ही निवडून दिलेला आमदार तुमचा सगळ्यांचा सहकारी पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारून काम करतोय. पहिल्या शंभर दिवसांमध्ये पहिल्या पाच क्रमांकाचे मंत्रिपद आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे आणि प्रयत्नाने हे सगळं मिळवणं शक्य झालं. मंत्रालयात बसून माझा सिंधुदुर्ग जिल्हा, माझा मतदार संघ माझ्या खांद्यावर बसवून महाराष्ट्राकडे पाहत असतो.
पुढे ते म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायतच्या निवडणुका येत आहेत. पुढच्या वर्षी जेव्हा वाढदिवसाला एकत्र आपण जमू तेव्हा या व्यासपीठावर असंख्य पदं असलेले माझे सहकारी माझ्या खांद्याला खांदा लावून उपस्थित असतील, असा विश्वास देखील पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला.