देवगड तालुक्यातील नारिंगे येथे झाला अपघात…
देवगड : देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथे रिक्षा आणि एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
मृतांमध्ये मालवण तालुक्यातील आचरा येथील रिक्षा व्यावसायिकांचा समावेश आहे. मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: संकेत सदानंद घाडी (वय ३५, आचरा वरचीवाडी), संतोष रामजी गावकर (वय ३५, आचरा गाऊडवाडी), रोहन मोहन नाईक (वय ३५, आचरा गाऊडवाडी) आणि सोनू कोळंबकर (वय ४५, आचरा पिरावाडी). या चौघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
या अपघातात रघुनाथ बिनसाळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी गोवा येथील बांभुळी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विजयदुर्ग-मालवण मार्गावर धावणारी एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली, ज्यामुळे रिक्षातील प्रवाशांचे प्राण तात्काळ गेले.
समजते की अपघातग्रस्त रिक्षातील प्रवासी संकेत घाडी हे आचरा येथे येऊन रस पिऊन पुन्हा प्रवासाला निघाले होते, मात्र त्यांचा मृत्यू अटळ ठरला. विशेष दुःखाची बाब म्हणजे संकेत घाडी यांनी केवळ पंधरा दिवसांपूर्वी आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण आचरा गावावर शोककळा पसरली आहे. हे सर्व रिक्षा चालक होते.आचरा येथील रिक्षा व्यावसायिक या दुर्दैवी घटनेने प्रचंड हादरले आहेत. ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत असून गावात शोकाकुल वातावरण आहे.