15.6 C
New York
Sunday, June 15, 2025

Buy now

कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील वाहनांवर आरटीओ ची कारवाई

पटवर्धन चौक ते पटकीदेवी मंदिर बाजारपेठेतील अतिक्रमणे सोमवारी हटविणार

नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन करणार संयुक्तीक कारवाई

कणकवली : कणकवली शहरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. अनेक विक्रेते, वाहन चालक शिवाय बाजारपेठेत प्रवेश केल्यावर बाजारपेठेतील पटवर्धन चौक ते पटकी देवी मंदिर पर्यंत रस्त्यावर दुकाने थाटल्याने समोरासमोर येणाऱ्या वाहनांना बाजू देऊन जाणे शक्य होत नव्हते. या समस्यांसह अन्य समस्या पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत मांडण्यात आल्या. त्यानुसार पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिलेल्या सूचनांची दखल घेत शनिवारी आरटीओच्या अधिकाऱ्यांनी कणकवली पोलिसांच्या सहकार्याने कणकवली नरडवे नाका ते स्टेट बँक दरम्यान उड्डाण पुलाखाली अनधिकृतपणे उभी केलेली वाहने, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी जी वाहने पार्किंग केलेली होती त्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाईमध्ये सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पराग मातोंडकर, प्रीतम पोवार, धनंजय हिले, वाहन चालक वैभव राणे, सचिन सावंत, श्री. कुडाळकर यांच्यासह कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप वाहतूक, पोलीस विनोद चव्हाण, पोलीस नाईक रुपेश गुरव या कारवाईत सहभागी झाले होते.

दरम्यान जे वाहन चालक वाहनांजवळ नव्हते अशा वाहन चालकांना यावेळी फोन करून माहिती देण्यात आली. तसेच त्यांना बोलावून वाहने बाजूला करण्यात आली. तसेच अनधिकृत ठिकाणी वाहन पार्किंग व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई देखील करण्यात आली. तसेच ही कारवाई यापुढे देखील सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

अन्यथा सोमवारी प्रशासन कारवाई करणार – मुख्याधिकारी गौरी पाटील

कणकवली बाजारपेठेतील पटवर्धन चौक ते पटकीदेवी मंदिर दरम्यानच्या रस्त्यावर वाहतुकीला अडचण ठरणारी अतिक्रमणे, पोस्टर, शेड्स ही शनिवारी आणि रविवारी दोन दिवसात संबंधितांनी स्वतःहून बाजूला करावी अशी सूचना देण्यात आली आहे. दोन दिवसात संबंधितांनी अतिक्रमणे न हटविल्यास सोमवारपासून प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई करून अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याची माहिती देखील मुख्याधिकारी गौरी पाटील व पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली आहे.

सदरची अतिक्रमाने हटविल्यानंतर नगरपंचायत च्या माध्यमातून शहरातून एक दिशा मार्गाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच समाविष्ट तारखांना पार्किंग करण्याबाबतही नियोजन करून निर्णय घेणार असल्याचे देखील, मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!