बोगस मतांच्या पाठबळावर राज्यात महायुती सरकार
कणकवली : बोगस मतांच्या पाठबळावर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. याविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्रात झालेल्या मतदानाची आकडेवारी मागितली आहे. ही आकडेवारी देण्यास आयोग दिरंगाई करत आहे. यात लोकशाहीची प्रक्रियाच धोक्यात आली आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने कणकवलीत उद्या मशाल रॅली काढणार आहे. या रॅलीत जिल्हावासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी आज येथे केले. कणकवली काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात श्री.शेख यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण वरूणकर, तालुका उपाध्यक्षा आयशा सय्यद, जिल्हा सचिव विजय सावंत आदी उपस्थित होते. श्री.शेख म्हणाले, महाराष्ट्रात झालेल्या मतदानामध्ये शेवटच्या टप्प्यात लाखोंनी मते वाढली. त्यामुळे या मतदानाबाबत राहूल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले. मतदानाबाबतची सर्व माहिती त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागितली. त्या अनुषंगाने अनेक पुरावेही दिले. परंतु निवडणूक आयोगाने त्याबाबत अद्यापही माहिती दिलेली नाही. महाराष्ट्रात झालेल्या निवडणुक घोटाळ्याचा पर्दापाशही नुकताच श्री.गांधी यांनी केला. त्याबाबतचे श्री.गांधी यांचे मुद्दे निवडणूक आयोगाला खोडून काढता आले नाहीत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहल गांधी यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र फडणवीस यांनी अनेक मुद्दयांना बगल दिली आहे. महाराष्ट्रात झालेल्या बोगस मतदानामुळे लोकशाहीची संपूर्ण प्रक्रियाच धोक्यात आली आहे. याबाबत जनजागृती होण्यासाठी कणकवलीत उद्या १२ जून रोजी मशाल रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी साडे सहा वाजता बसस्थानकालगतच्या बौद्ध विहार येथून या रॅलीला सुरूवात होईल. तेथून अप्पासाहेब पटवर्धन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ही रॅली निघणार असल्याची माहिती इर्शाद शेख यांनी दिली.