तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या सरपंच, ग्रामसेवक व तलाठ्यांना सूचना
कणकवली : तालुक्यातील पावसाळ्याच्या कालावधीत पूर प्रवण व दरड प्रवण क्षेत्र निश्चित करण्यात आले असून या क्षेत्रातील नागरिकांना आवश्यक त्या सूचना देऊन त्यांना सुरक्षित स्थळी वेळीच स्थलांतरित करावे अशा सूचना कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिल्या.
कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये पूरप्रवण क्षेत्र व दरड प्रवण क्षेत्रातील गावातील सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांना मार्गदर्शन करताना श्री देशपांडे बोलत होते.
कणकवली तालुक्यातील पूर प्रवण क्षेत्रांमध्ये खारेपाटण, कलमठ मधील काही भाग, वरवडे फणसनगर मधील काही भाग तसेच कळसुली व कसवण तळवडे या दोन्ही गावांमधील काही भाग हा निश्चित करण्यात आला आहे. तर दरड प्रवण क्षेत्रांमध्ये दिगवळे, नडगीवे व नाटळ ही गावे निश्चित करण्यात आली आहेत. या गावातील ग्रामस्थांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने पावसाळा कालावधीत या गावांमधील सरपंच ग्रामसेवक व तलाठी यांची बैठक नुकतीच तहसीलदार दीक्षांचा देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आली. यावेळी यापूर्वी या भागांमध्ये कोसळलेल्या दरडी व आलेला पूर याचा विचार करता कोणतीही जीवितहानी होऊ नये या दृष्टीने सतर्कतेच्या सूचना श्री देशपांडे यांनी दिल्या. तसेच या ठिकाणी दरड कोसळू शकते अशा संभाव्य ठिकाणी नियमित लक्ष ठेवून या दरड प्रवण क्षेत्राच्या खालील भागातील ग्रामस्थांना आपल्या नातेवाईक किंवा अन्य निकटवर्तीयांकडे स्थलांतरित होण्याबाबत सूचना द्या असेही सांगण्यात आले. तर पावसाळा कालावधीमध्ये पूर प्रवण क्षेत्रामध्ये असणाऱ्या नागरिकांनी पुराचे पाणी जवळ येत असताना धोकादायक स्थितीत न थांबता वेळीच स्थलांतरित व्हावे. तसेच मदतीची आवश्यकता असल्यास प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा. सरपंच ग्रामसेवक व तलाठी यांनी या लोकांशी संवाद साधून त्यांना संभाव्य धोक्याची कल्पना द्यावी. व जेणेकरून कुणालाही धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना श्री देशपांडे यांनी यावेळी दिल्या.