सावंतवाडी, कणकवलीतील विज वाहिन्या “अंडरग्राउंड” करण्यासाठी प्रयत्न
सावंतवाडी : हत्ती, गवे, माकडे यांना रोखण्याचे काम सोडुन कोल्हापुर मुख्य वनसंरक्षक रामानुजन हे नाहक कात व्यावसायिकांवर कारवाई करीत आहेत. हत्ती हटाव मोहीम यशस्वी झाली असती परंतू त्यांच्या हेकेखोरपणामुळे ती होवू शकली नाही. त्यामुळे त्यांची त्या पदावरुन बदली झाली पाहिजे तरच पुढील प्रश्न मार्गी लागू शकतो, अशी नाराजी आमदार तथा माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.
सिंधुदुर्गात विजेची वारंवार होणारी समस्या लक्षात घेता किनारपट्टी भागाप्रमाणे सावंतवाडी व कणकवली ही दोन शहरे सावंतवाडी, इन्सुली, सासोली, वेंगुर्ला, मळेवाड हा भाग “अंडरग्राउंड” वीज वाहिन्या घालण्याचा आमचा विचार आहे. तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे सादर करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री. केसरकर यांनी आपल्या निवासस्थांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना हत्ती हटाव मोहीम न झाल्यामुळे हत्तीपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत छेडले असता त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कोल्हापुर मुख्य वनसंरक्षकांच्या नाकर्तेपणामुळे हा प्रश्न अंधातरीत राहीला. त्यामुळे त्याला जबाबदार धरुन त्यांची बदली होणे गरजेचे आहे. अन्यथा हा प्रश्न सुटणार नाही. हत्ती, गवे, माकड यांना रोखायचे सोडुन ते कात व्यावसायिकांवर चुकीच्या पध्दतीने कारवाई करीत आहेत. हा सर्व प्रकार चुकीचा आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.