आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
कुडाळ : जीवनात मिळालेले यश प्रेरणादायी असते. मात्र पुढील आयुष्यात आपल्याला जास्तीत जास्त यशोशिखरे पादाक्रांत करावयाची असतील तर आपल्या अभ्यासाची क्षेत्रे विस्तारित करणे गरजेचे आहे. असे केल्यास तुम्ही जीवनात हमखास यश मिळवाल, असा मौलिक सल्ला कुडाळ पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी दिला आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच इतर क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा कुडाळ येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून श्री. वालावलकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुडाळ पंचायत समितीचे माजी उपसभापती आर. के सावंत, जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी, उपाध्यक्ष आनंद कांडरकर, सचिव विनोद जाधव, महिला जिल्हाध्यक्षा सौ. मानसी परब, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रा. रूपेश पाटील, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप सुकी, सदस्य मनोज वारे, सदस्य मनोज तोरसकर,अमित देसाई, संजय पालव, नामदेव जानकर, कवी दीपक पटेकर, नितीन शिरोडकर, पत्रकार साबाजी परब, सौ. पार्वती वेंगुर्लेकर, सौ. कोमल पारकर, सौ. रमा खानोलकर, सौ.छाया सावंत, कु. सिध्दी पारकर, कु.दर्शना मेस्त्री, कु.सानिका परब, कु. पाटील, कु. धनश्री सडवेलकर आदी उपस्थित होते.
दरम्यान सहाय्यक गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर पुढे म्हणाले, आयुष्यात कोणतेही क्षेत्र करियर म्हणून निवडताना काळजीपूर्वक निवडा. केवळ पुस्तकी किडा बनून राहू नका. कारण बऱ्याच गोष्टी पुस्तकाच्या बाहेरही असतात. ज्या आपल्या जीवनाला एक चांगली दिशा देऊ शकतात.
यावेळी उपस्थित आर. के. सावंत यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. मात्र त्यांना योग्य दिशा देण्यासाठी चांगले मार्गदर्शकांची कमतरता आहे. त्यामुळे गुणवत्ता असूनही आपले विद्यार्थी भरकटत जातात. माध्यमिक स्तरावर मिळवलेले यश पुढे कायम टिकवण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षांची कास धरणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. मानसी परब यांनी आपल्या मनोगतातून संघटनेचे कार्य विषद करून संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत केलेल्या विविध विधायक कार्य आणि उपक्रमांचा आढावा घेतला.
दरम्यान यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे सचिव दीपक पटेकर यांचा शाल, श्रीफळ व बुके देऊन सहाय्यक गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने कु. रेश्मा पालव हिने आपले मनोगत व्यक्त करून संघटनेचा हा उपक्रम स्तुत्य असून यापुढे देखील अशा उपक्रमांचे आयोजन करावे, अशी विनंती संयोजकांना केली.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद धुरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रूपेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सचिव विनोद जाधव यांनी केले.