कळसुली भोगनाथवाडी रहिवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांची पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे मागणी
कणकवली | मयुर ठाकूर : तालुक्यातील कळसुली येथील देंदोनेवाडी पाटबंधारे पाणी प्रकल्पाच्या पाण्यापासून कळसुली गावातील काही वाड्या या वंचित आहेत. उन्हाळात या वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होते. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. ही पाणी टंचाई दूर होण्यासाठी देंदोनेवाडी पाटबंधारे प्रकल्पातून पाण्याच्या पुरवठा होण्यासाठी कॅनॉल किंवा पाईप लाईन टाकून पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी कळसुली – भोगनाथवाडी रहिवासी संघ, मुंबईचे कार्याध्यक्ष विद्याधर दळवी, अध्यक्ष अंकुश परब, सचिव प्रकाश सावंत यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदरील निवेदनात असे म्हटले आहे की, देंदोनेवाडी पाटबंधारे पाणी प्रकल्पातील पाण्यापासून कळसुली भोगनाथवाडी, गांगोसकलवाडी, बौद्धवाडी, परबवाडी, सुद्रिकवाडी या वाड्या पाण्यापासून वंचित आहेत. उन्हाळी हंगामात या वाड्यांमध्ये पाणी टंचाईची झळ मोठ्या प्रमाणात बसते. कळसुली गावामध्ये पाणी प्रकल्प असून त्याचा फायदा या वाड्यांना होत नाही. एप्रिल – मे महिन्यात विहिरींची जल पातळी पूर्णतः कमी होते. त्यामुळे पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यावर समस्येवर लक्ष देऊन लवकरात लवकर समस्या सोडवावी कळसुली भोगनाथवाडी रहिवाशी संघ मुंबई च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.