दोन्ही बाजूंच्या भरावाचे काम सुरू ः १२ ते १५ जून पर्यंत वाहतूक सुरू करण्याचे नियोजन
कणकवली : कणकवली आचरा मार्गावरील वरवडे पूल लवकरच वाहतुकीस खुला होणार आहे. पुलाच्या दोन्ही बाजूनी मातीचा भराव टाकण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. येत्या १२ ते १५ जून पासून या पुलावरून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यंदा मे महिन्यातच तफान पाऊस झाला. त्यामुळे वरवडे पुलालगतचा पर्याय मार्ग पाण्याखाली गेला. तर वरवडे पुलाच्या दोन्ही बाजूंचे भराव काम रखडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सध्या कलमठ कुंभारवाडी आणि बिडवाडी मार्गे आचरा कणकवली मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. त्याचा वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या आचरा ते कणकवली दिशेच्या पुलाच्या एका बाजूच्या भरावाचे काम पूर्ण झाले आहे. तर पुढील चार दिवसांत कणकवली ते आचरा दिशेच्या पुलाच्या भरावाचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर या पुलावरून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन ठेकेदार आणि बांधकाम विभागाने केले आहे. वरवडे पुलावरून वाहतूक सुरू झाल्यास वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.