कुडाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीला ७७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज कुडाळ एसटी बसस्थानकात वर्धापन दिन फटाके फोडून व केक कापून एकमेकांना केक भरवून जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावेळी कुडाळ आगाराचे व्यवस्थापक रोहित नाईक प्रवाशांना शुभेच्छा देत आवाहन करताना सांगितले की, एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. तिच्यातून जास्तीत-जास्त प्रवाशांनी प्रवास करून आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी. एसटी बस आता हळूहळू एआय स्मार्ट टेक्नॉलॉजीमध्ये प्रवास करीत आहे. त्यामुळे येत्या काळात प्रवाशांना नवनवीन सेवासुविधा मिळणार आहेत. प्रवाशांनी त्या सेवा सुविधांचा लाभ घ्यावा. यावेळी प्रा. वैभव खानोलकर, वाहतूक निरीक्षक पल्लवी मौर्ये, वाहतूक नियंत्रक महादेव आंबेसकर, रावजी राणे, लिपिक वैभव वंजारे, गणेश कुंभार, लेखाकार विशाल कांबळी, यांत्रिकी संजय पाथरुठ, वरिष्ठ लिपिक तनया सावंत, चालक एस. ए. माळकर, चालक-वाहक आर. पी. चव्हाण, वाहक राजेश मसुरकर, प्रवासी मित्र जयराम डिगसकर, नारायण तळेकर आदी चालक-वाहक व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वर्धापन दिनानिमित्त कुडाळ एसटी बसस्थानकात आकर्षक रांगोळी काढून फुगे फुगवून व फुलांची सजावट करून बसचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक नारायण तळेकर यांच्या हस्ते एसटी बसला पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून केक कापण्यात आला. तसेच एसटी बसला कोकणप्रेमी एसटी ग्रुपच्या वतीने उपस्थितांच्या हस्ते कुडाळ-विजापूर असा नामफलकाचा बोर्ड आगारास भेट देण्यात आला.
पुणे-अहमदनगर मार्गावर १ जून १९४८ साली एसटीची पहिली बस धावली होती. त्यानिमित्त दरवर्षी १ जून हा एसटीचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो. गेली ७७ वर्षे राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित व अल्पदरात प्रवासी दळणवळण सेवा देण्याचे प्रयत्न एसटी बस प्रामाणिकपणे करीत आली आहे.
यावेळी प्रवासी वैभव खानोलकर म्हणाले की, सौजन्य हा एसटी महामंडळाचा आत्मा आहे आणि या सौजन्याच्या माध्यमातून एसटी महामंडळाने प्रवास करीत असताना अनेक प्रवासी व ग्रुप जोडण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात ज्यावेळी अस्पृश्यता होती, त्यावेळी सर्वांना एकाच धाग्यात बांधून गावोगावी खेडोखेडी जोडण्याच काम एसटीने केले. एसटी महामंडळाला आज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एसटी महामंडळ हे “ना नफा ना तोटा” या तत्त्वावर चालत आहे. त्यामुळे शासनाने एसटी महामंडळाला टोलमाफीतून मुक्त करावे. टोलमाफ केल्यामुळे जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना वाहतूक स्वस्त होईल. यादृष्टीने सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली. एसटी चालली तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र चालेल. सामान्य लोकांमध्ये एसटी बद्दलची असलेली तळमळ आजही दिसत आहे. भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे महामंडळ हे एसटी महामंडळ आहे. एवढी एसटीची ताकद आहे. “बहुजन हिताय बहुजन सुखाय” च्या माध्यमातून प्रत्येकाला एसटीचा प्रवास आपला वाटतो. यापुढेही एसटी बसची घोडदौड अशीच सुरु राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. जयराम डिगसकर व नारायण तळेकर यांनी वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर महादेव आंबेसकर यांनी आभार मानले.