सावंतवाडी : गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी मालवण येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन बैल आणि वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सातुळी तिठा येथे करण्यात आली. बापूजी सूर्यकांत जुवेकर (वय ४३, रा. पळसभ-गावठाणवाडी) व लक्ष्मण शंकर गौंडे (वय ४३, रा. आचरा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा-संकेश्वर महामार्गावर सातुळी तिठा येथे ११ वाजण्याच्या सुमारास टेम्पो मधून बेकायदा गुरांची वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये दोन बैल आढळून आले. त्यानुसार त्यांच्यावर प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण व उपनिरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक शिंदे, मनीष शिंदे आदींच्या पथकाकडून करण्यात आली.