कुडाळ : येथील तहसीलदार प्रशासनाच्या वतीने नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या रंगीत तालीममध्ये कुडाळ महामार्ग विभागाचे अधिकारी नापास झाले आहेत. महामार्गावर आपत्ती घडल्याचे कळविल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी संबंधित विभागाचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी दाखल झाला नाही. उलट हा भाग आपल्या हद्दीत येत नाही, असे सांगून काही अधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत. याबाबत तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या अवकाळी पाऊस व मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आज तहसीलदार प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी आरोग्य सहाय्यक राघोजी चेंदवणकर, आरोग्य सेवक रविंद्र गावडे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूरची ऍम्ब्युलन्स व आरोग्य पथक डॉ. कविता पराडकर, नर्स श्रीम, टेमकर यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्याच बरोबर निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, महसूल नायब तहसीलदार संजय गवस, नायब तहसीलदार प्रमोद पिळणकर, मंडळ अधिकारी श्री गुरव, ग्राम महसूल अधिकारी, कर्मचारी यांनी घटना स्थळी धाव घेतली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविल्यावर त्यांनी मात्र घटनास्थळ या विभागाच्या अखत्यारीत येत नसून राष्ट्रीय महामार्ग विभागाला कळविणेस सांगितले. पण राष्ट्रीय महामार्ग विभागाला कळवूनही त्यांचा अधिकारी किंवा पथक उपस्थित नव्हते. कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच इतर सर्व यंत्रणा घटनास्थळी वेळीच उपस्थित झालेबाबत सर्वांचे आभार मानून आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यानंतरही असाच सर्वानी प्रतिसाद दयावा असे सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. ही तर रंगीत तालीम होती. पण उद्या एखादी खरीच आपत्ती ओढवली तर राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची हीच प्रतिक्रिया असेल तर मात्र कठीण आहे, अशीच प्रतिक्रिया उपस्थित लोकांमधून उमटली.