जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; प्रशासन अलर्ट, सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील तब्बल ४५ गावे पुरबाधीत क्षेत्र म्हणून तर ६३ गावे दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी खबरदारी म्हणून आपत्कालीन व्यवस्थापना अंतर्गत योग्य ती कारवाई करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली. दरम्यान यापैकी २० गावांमध्ये यापूर्वी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या तर ३० गावामध्ये तशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्या अनुषंगाने ३८ ग्रामपंचायतींना आपत्कालीन कीटसचे वाटप करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गात नुकताच अवकाळी पाऊस आणि त्यानंतर मान्सून पावसामुळे सततधार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या तसेच पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत खबरदारी म्हणून प्रशासन सतर्क आहे. या पार्श्वभूमीवर आज श्री. पाटील यांनी ही माहिती दिली.