16.5 C
New York
Monday, June 2, 2025

Buy now

नाटकाच्या माध्यमातून ‘शिवराज भूषण’ काव्य सर्वांपर्यंत पोहचेल – पंकज भोसले

मालवणात शिवराज भूषण महानाट्याच्या फलकाचे अनावरण

मालवण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासात समकालीन कवी असलेल्या कवी भूषण यांनी लिहिलेले शिवराज भूषण हे छंदरुपी काव्य मालवणमधील कलाकार नाट्यरूपात रंगमंचावर आणत आहेत, या काव्यात शिवरायांचा इतिहास लिहिला असून नाटकाच्या माध्यमातून शिवराज भूषण काव्य सर्वांपर्यंत पोहचेल, असे प्रतिपादन शिवशंभू विचारमंच ठाणे चे प्रांत संयोजक आणि कवी भूषण कथनकार श्री. पंकज भोसले यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील श्री शिवराज मंच यांच्यातर्फे ‘शिवराज भूषण’ हे ऐतिहासिक महानाट्य शिवराज्याभिषेक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त दि. ६ व ७ जून रोजी मामा वारेरकर नाट्यगृह मालवण येथे सायंकाळी ७ वाजता सादर होणार असून या नाटकाच्या फलकाचे अनावरण तसेच तिकीट विक्रीचा शुभारंभ शिवशंभू विचारमंच ठाणे चे प्रांत संयोजक आणि कवी भूषण कथनकार पंकज भोसले यांच्या हस्ते मामा वारेरकर नाट्यगृह येथे कारण्यात आला. या प्रसंगी नाटकाचे लेखक व देवगड येथील इतिहास अभ्यासक श्री. रणजित हिर्लेकर, निर्माते भूषण साटम, दिग्दर्शक गणेश मेस्त्री, संवाद लेखक जितेंद्र तिरोडकर, भाऊ सामंत, समीर शिंदे, संजय शिंदे, श्रीराज बादेकर, शुभदा टिकम, पूजा सरकारे, सुभाष कुमठेकर आदी व इतर कलाकार उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी पत्रकारांशी संवाद साधत नाटकाविषयी माहिती दिली. यावेळी पंकज भोसले म्हणाले, कवी भूषण यांचे शिवराज भूषण हे काव्य महाराष्ट्रात पडद्यामागेच राहिले. हे काव्य ब्रज भाषेत लिहिलेले असल्याने त्याचे महाराष्ट्रातील लोकांना अवलोकन होत नाही. हे काव्य म्हणजे शिवरायांच्या काळात त्यांच्या सोबत असलेल्या समकालीन कवीने लिहिलेला शिवरायांचा इतिहास आहे.
शिवराज भूषण हे एक जागर गीत असून ते नाटकाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचले पाहिजे, या काव्याचे पारायण झाले पाहिजे. या काव्यात लिहिलेला शिवरायांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी मालवणच्या कलाकारांनी एकत्र येऊन केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे, या नाटकाचे उत्तरोत्तर प्रयोग होत रहो, असेही भोसले म्हणाले.

यावेळी रणजित हिर्लेकर म्हणाले, शिवरायांच्या पराक्रमाने प्रेरित होऊन कवी भूषण यांनी शिवरायांसोबत राहून छंद रूपात आणि ब्रज भाषेत शिवरायांचे कार्य, पराक्रम लिहून ठेवला. ब्रज भाषा उत्तर भारतात ज्ञात असल्याने छंदाद्वारे उत्तर भारतात आपले कार्य पोहचविण्याची जबाबदारी शिवरायांनी कवी भूषण यांच्यावर सोपवली होती व कवी भूषण यांनी आयुष्यभर हे कार्य केले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य समजून घेण्यासाठी कवी भूषण यांचे काव्य वाचले पाहिजे, असेही ते म्हणाले.

यावेळी भूषण साटम म्हणाले, ६० कलाकारांच्या साधनेतून शिवराज भूषण ही नाट्य कलाकृती तयार होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा समकालीन इतिहास सर्वदूर पोहचविणे हा आमचा संकल्प आहे. शिवरायचा राज्याभिषेकाचा शक १५९६ होता. त्याची बेरीज २१ येत असल्याने नाटकाचे तिकीट म्हणून २१ रु. एवढे संकल्प मूल्य ठेवण्यात आले आहे, नाट्यरसिकानी नाटक पाहण्यास उपस्थित राहून आमच्या या संकल्पास साथ द्यावी, असे आवाहन श्री. साटम यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!