वेंगुर्ले : दोन तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले शहरातील महाजनवाडी शेजारी पाटीलवाड्या जवळ असलेल्या बंधाऱ्याकडे कचरा, झाडे अडकल्याने त्या भागात पाणी साचले आणि शेतामध्ये व बागायती मध्ये घुसले. याबाबत तहसीलदार ओंकार ओतारी यांना माहिती मिळताच त्यांनी वेंगुर्ले न. प. च्या कर्मचाऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना बरोबर घेऊन बंधाऱ्यात अडकलेले कचरा, झाडे साफ केली. तसेच बंधाऱ्यावरील दोन दोन फळ्या मोकळ्या केल्याने पाणी प्रवाह सुरळीत झाला आहे. परिणामी पुढील धोका टळला आहे.
या बंधाऱ्यामुळे एका बाजूने पाणी फुगवटा झाल्यामुळे परिसरातील शेतात, बागायती मध्ये तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. गेले दोन तीन दिवस पडणाऱ्या धुवाधार पावसामुळे पाटीलवाडा, राऊळवाडा परिसरात दाणादाण उडाली. तहसीलदार यांना याबाबत कळताच त्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आणि त्या बंधाऱ्यामधील पाणीपुरवठा सुरळीत केला.
हा बंधारा यावर्षी जानेवारी महिन्यात लोखंडी प्लेटच्या साह्याने घालण्यात आला उन्हाळ्यात पाणीटंचाई होऊ नये म्हणून तो दरवर्षी घालण्यात येतो व पावसाळ्यापूर्वी तो काढण्यात येतो. पण यावर्षी वेळीच काढला गेला नसल्याने ही परिस्थिती उद्भवली.
दरम्यान ढोकम पाटीलवाडा येथे १५० फुट लांब असलेला संरक्षक कठडा अतिवृष्टीमुळे व शासनाच्या दुर्लक्षपणामुळे कोसळला आहे. तरी नगरपरिषद प्रशासनाने तो पुन्हा सुस्थितीत बांधून द्यावा अशी मागणी तेथील नागरिकाकडून करण्यात आली आहे.