24.9 C
New York
Tuesday, June 3, 2025

Buy now

तुटलेल्या वीज तारांचा शॉक लागून बैलाचा मृत्यू…

वैभववाडी – मांगवली येथे तुटलेल्या वीज तारांचा शॉक लागून बैलाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेत यशवंत भास्कर नाटेकर या गरीब शेतकऱ्याचे सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवानेच येथे मनुष्यहानी टळली.

मांगवली मांडवकरवाडी येथील नाटेकर यांचा बैल चारणीसाठी सोडलेला होता. हा बैल जवळच असलेल्या ढवळवाडी येथील श्री. ढवळ यांच्या परड्यात गेला होता. ढवळ कुटुंब कोल्हापूर येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे घर बंद असतें.

ढवळ यांच्या परड्यात विजेचा खांब असून हा खांब पूर्णतः वाकलेल्या स्थितीत आहे. याकडे वीज वितरण ने दुर्लक्ष केल्याने तो त्याच अवस्थेत आहे. शिवाय या खांबाच्या विद्युत तारांमधून वीज प्रवाह सुरु आहे. ज्यावेळी बैल या तारांच्या नजीक गेल्या त्यावेळी त्याला विद्युतभारीत तारांचा शॉक लागून बैल जागीच गतप्राण झाला.

शनिवारी सकाळी ढवळ यांच्या घराजवळून जाणाऱ्या एका ग्रामस्थाच्या निदर्शनास आली. त्यांनी याची माहिती शेतकरी नाटेकर यांना दिली. या दुर्घटनेत शेतकरी यशवंत नाटेकर यांचे सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन शेतीच्या हंगामात शेतकरी नाटेकर यांच्यावर आपत्ती ओढविली आहे.

या घटनेची माहिती मिळताच वीज वितरण चे नेर्ले येथील अधिकारी, मांगवली सरपंच शिवाजी नाटेकर, पशु वैद्यकीय अधिकारी श्री. पाटील, पोलीस पाटील कमलाकर लिंगायत यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. शेतकरी नाटेकर यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

मांगवली येथे या विद्युतभारीत तारांची कोणालाच माहिती नव्हती. अशावेळी मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने मनुष्यहानी टळली. वीज वितरण कडून तालुक्यातील जीर्ण वीज खांब बदलण्याचे काम करण्यात आलेले नाही. तालुक्यातील ग्रामीण भागात अशा वारंवार घटना घडत आहेत. मात्र ग्रामीण भागातील गंजलेले व जीर्ण पोल, जुन्या विद्युत तारा यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!