14.9 C
New York
Sunday, June 1, 2025

Buy now

“येतंव’ ॲपमुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना मिळेल

पालकमंत्री ना. नितेश राणे ; आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम पहायला मिळतो

“येतंव’ या ॲपचा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते उद्घाटन

कणकवली : आमचा सिंधुदुर्ग जिल्हा खरोखरच बदलत आहे. अनेक विविध प्रकारचे नवीन प्रकल्प, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात काही नवीन प्रकल्प, विकसनशील कामे, सुरू करायची झाली तर त्याला पहिला विरोध मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र आजच्या या “येतंव’ ॲपच्या उद्घाटन प्रसंगी तसे काही जाणवले नाही. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या काही नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जात आहे . “येतंव’ ॲपमुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना मिळेल, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले.

कणकवली कॉलेज येथे आयोजित “येतंव’ ॲपच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते “येतंव’ या ॲपचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उद्घाटन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री ना. नितेश राणे, व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, सुबोध मेस्त्री, आनंद वामनसे, प्राचार्य युवराज महालिंगे, माजी अध्यक्ष बाळा वळंजू, तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, रिक्षा चालक मालक संघटना जिल्हाध्यक्ष नागेश तोरसकर, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, बाळा वराडकर, संजय मालंडकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, मेघा गांगण, विशाल कामत, प्रशांत बुचडे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते.

पुढे ना. नितेश राणे म्हणाले, प्रवासी आवी व्यावसायिक वाहनचालक यांना थेट जोडून देणार हे “येतंव’ ॲप पुढे नक्कीच भरारी घेईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोक, पर्यटक या ॲपचा जास्तीत जास्त वापर करतील, असा विश्वास देखील पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला. तसेच हे ॲप सुरू करण्याचा धाडस करणं एवढं सोप नाही. तसेच हे ॲप सुरू करताना महत्वाचं म्हणजे कोणताही विरोध झालेला नाही, ही आनंददायी बाब असल्याचेही ते म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा बदलायचा असेल तर विरोधाची भावना बाजूला करून त्यातून चांगले विचार घेऊन ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. राज्यात आपला जिल्हा हा पहिला जिल्हा आहे जो नवनवीन टेक्नॉलॉजीच्या वाटेवर प्रवास करत आहे. AI सारख्या आधुनिक प्रणालीचा वापर आपण करत आहोत. येणारे अडथळे सोडवण्यासाठी AI चा वापर केला जातो. त्यामुळे व्यापारी महासंघाने जिल्ह्यात जो “येतंव’ ॲप या भागाला साजेसा आणि सोईस्कर उपलब्ध करून दिला त्याबद्दल पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सर्वांचे आभार मानले. नवनवीन गोष्टी उपलब्ध करण्यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न करावे लागणार आहेत. AI मुले जिल्ह्यात किती फरक पडला हे सर्वांना कळेल. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी खाजगी रुग्णालय, हॉटेल, कॉलेज, पर्यटन स्थळ आहेत अशा ठिकाणी माहितीसाठी या “येतंव’ ॲप ची पोस्टर लावली पाहिजेत जेणेकरून येणाऱ्या लोकांना याची माहिती मिळू शकेल. आणि तात्काळ वाहनाची व्यवस्था देखील होऊ शकेल. कोकणात येणारा पर्यटक हा खर्च करणारा असतो. त्यामुळे या ॲप चा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो. गणपती, आंगणेवाडी, कुणकेश्वर अशा अनेक जत्रोत्सव ना चाकरमानी येतात त्यांना देखील या सुविधेचा मोठा फायदा होईल. शिरोड्याच ताज हॉटेल पुन्हा सुरू करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या सहकार्याने प्रयत्न सुरू आहेत. सी वर्ल्ड परत आणण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहे. पत्रकार, व्यापारी, नागरिक हे सिंधुदुर्गचे आधारस्तंभ आहेत, असे गौरवोद्गार देखील पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह नितीन वाळके यांनी केले. ते म्हणाले, कोरोना नंतर व्यापार विश्वावर होणाऱ्या आक्रमनावर चर्चा सुरू होत्या. मात्र ३१ जानेवारीच्या वैभववाडी येथील मेळाव्यात पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी योग्य दिशा दाखवली. व्यापार सुधारायचा असेल, तर तंत्रज्ञान वापरण महत्वाचं आहे. तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय कोणतंही काम शक्य नाही. त्यामुळे या “येतंव’ ॲप ची ६ एप्रिल ला देवगड व मालवण या ठिकाणी ॲप लॉन्च केला. सव्वा महिन्यात ५२०० पेक्षा अधिक लोकांनी हे ॲप डाउनलोड केलं आहे. तर २०० पेक्षा जास्त रिक्षा चालक स्वतः रजिस्टर झाले. ॲप च्या माध्यमातून प्रवाश्यांची वाट पहावी लागत नाही. ११८४ कॉल गेलेले आहेत. ५० पेक्षा जास्त कॉल महिला आणि मुलींनी केलेले आहेत. तंत्रज्ञान वापरून ही आजच्या काळात गरज बनली आहे. हे ॲप नि:शुल्क आहे. चालक आणि प्रवासी यांच्यात थेट संपर्क करून देण्यासाठी हे ॲप महत्वपूर्ण योगदान देणार आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झालेलं आहे.

व्यापारी महासंघ जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर म्हणाले, व्यापार करताना सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. नागरिकांना – ग्राहकांना सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हा व्यापारी “येतंव’ ॲप सुरू केला आहे. पुढे जास्तीत जास्त व्यवसायिकाना यात समाविष्ट करून घेतले जाणार आहे. वाहनचालक, व्यावसायिकांच्या ज्या काही समस्या, प्रश्न असतील ते पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या मदतीने सोडवले जातील असे श्री. पारकर म्हणाले.

दरम्यान उद्घाटनापूर्वी ॲपचे डेव्हलपर सुबोध मेस्त्री, आनंद वामनसे यांनी उपस्थितांना माहिती दिली. तसेच हे ॲप कसे वापरायचे. त्यासाठी काय केले पाहिजे. याबाबत मार्गदर्शन देखील केले. कार्यवाह नितीन वाळके यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!